आशाताई बच्छाव
अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक, साठवणूक, वापर होत असल्याचे निदर्शनास येताच
नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी
जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
– अंमली पदार्थ विरोधात पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी
– गांजाची लागवड करणे बेकायदेशीर
– शाळा, महाविद्यालयस्तरावर अंमली पदार्थविरोधात जनजागृती करावी
– मेडिकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा तपासावा
जालना, दि. 22 (ब्युरो चीफ दिलीप बोंडे) :- आपल्या परिसरात जर अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक, वापर अथवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी त्याबाबतची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. तर ग्रामीण भागात अंमली पदार्थ वापराबाबत किंवा शेतात गांजा या पिकाची लागवड केल्याचे आढळल्यास सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली.
अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, या प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे, रेल्वेच्या पार्सल कार्यालयाचे प्रशांत स्वामी, सामान्य रुग्णालयाचे डॉ. संजय मेश्राम, शिक्षणाधिकारी मंगला धुपे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, अंमली पदार्थ शरीरास अत्यंत घातक आहेत. विशेषत: तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हयात अंमली पदार्थांच्या विरोधात धडकपणे कार्यवाई करावी.