Home सामाजिक संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारक-यांचा श्वास

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारक-यांचा श्वास

55
0

Yuva maratha news

1000322017.jpg

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारक-यांचा श्वास

महाराष्ट्रात संत परंपरेचा उदय तेराव्या शतकात झाला. यातही अनेक पंथ निर्माण झाले. नाथपंथ, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, रामदासी संप्रदाय, असे अनेक संप्रदाय निर्माण झाले. परंतु वारकरी संप्रदायाची परंपरा फार मोठी आहे. संत ज्ञानेश्र्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत रोहिदास व कनकदास, कान्होपात्रा, जनाबाई, चोखामेळा आदी संतांनी महाराष्ट्रात लोकजागृती केली. संत तुकाराम महाराज भक्तीचे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज शांतीचे, रामदास स्वामी क्रांतीचे व संत ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचे प्रतीक आहेत. आपल्याकडे अभिमानाची परंपरा आहे – परंतू परंपरेचा अभिमान नाही असे खेदाने म्हणावे लागते.
संतांचे कार्य हे जात – पात, देश – धर्म, यांच्या सीमा ओलांडून जातांना दिसते. माणूस केंद्र्स्थानी मानुन त्यांनी मानवतेची सेवा केली. श्रीगोंदा येथे वारकरी संत शेख महंमद यांचा दर्गा आहे. बाबा अनगड शा हे तुकाराम महाराजांचे शिष्य होते. व त्यांच्या दर्ग्याजवळ तुकाराम महाराजांच्या पालखीची पहिली आरती होते. अशी अनेक उदाहरणे सापडतील. पंढरीच्या वारीमध्येसुद्धा अनेक मुसलमान बांधव वारकर्‍याच्या भूमिकेतून सामील झालेले असतात.
ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारकर्‍यांचा श्वास आणि तुकाराम महाराज म्हणजे त्यांचा निःश्वास आहे. महाभारतात जे गीतेचे पीक आले होते, त्याची मळणी करुन सर्व लहान-थोर बांधवांना माऊलीने खाऊ घातले. “जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रती वाढो ! भूता परस्परे जडो ! मैत्र जीवांचे !” असा हट्ट ज्ञानेश्वरांनी धरला. त्यांचेच समकालीन व सहकारी संत नामदेव यांनी ‘नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ अशी प्रतिज्ञा करूनच समाजात ज्ञानप्रसाराचे कार्य केले. संत एकनाथांनी जगाच्या कल्याणासाठी “आईचा जोगवा” मागितला. संत तुकारामांचे सामाजिक भान तर पराकोटीचे होते. त्यांनी समाजातील दुष्ट व दांभिक प्रवृत्तीविरुद्ध सरळसरळ युद्धच पुकारले. “भले तरी देऊ, कासेची लंगोटी ! नाठाळाच्या माथी, हाणू काठी !” असे आव्हानच दिले. त्यासाठी त्यांनी शब्दांचा हत्यार म्हणून उपयोग केला. समर्थ रामदासांनी परकीय सत्तेच्या चाकरीत असलेल्या उच्चवणीर्यांना शिवाजी महाराजांचे माहात्म्य समजाऊन सांगितले. संतांचे कार्य केवळ आध्यात्मिक असल्याचा आरोप केला जातो, पण त्यात तथ्य नाही. संतांचे सामाजिक भान व्यापक व सर्वसमावेशक आहे. समाजाचे सुखदु:ख त्यांनी आपल्या अंतरंगात बिंबवले व त्यानुसार योग्य कृतीही केली.

रामभाऊ आवारे
राज्य प्रसिद्धीप्रमुख- युवा मराठा महासंघ

Previous articleश्रीक्षेत्र वडगाव पंगु येथील अखंड हरिनाम सप्ताहास  आज २८ पासून प्रारंभ
Next articleअखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती भोकरदन व जाफराबाद तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here