Yuva maratha news
शेती माल विषयी नवीन निर्यात धोरण; ‘या’ 20 पिकांची निर्यात वाढणार
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज)
सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून, शेतमालाच्या निर्यातीबाबत मोठी घोषणा केली आहे. यानुसार केंद्र सरकारकडून केळी, आंबा यासह तब्बल २० पिकांची निर्यात वाढवली जाणार आहे. केंद्र सरकारच्या कृषी विभागाने शेतमालाची निर्यात दुप्पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक कृती आराखडा देखील तयार केला जात आहे. दरम्यान, या नव्या कृषी निर्यात धोरणामुळे शेतमालाला चांगला दर मिळणार असून, याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
अधिक माहितीनुसार, कृषी निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 20 शेतमालांची यादी तयार केली आहे. यासंदर्भात एक कृती आराखडा देखील तयार केला जात आहे. यामध्ये नियमन नसलेल्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला असून, APEDA नुसार, या 20 उत्पादनांची निर्यात क्षमता ही तब्बल 56.7 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना अधिक दर मिळणार असून, वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी या उत्पादनांच्या निर्यातीच्या धोरणाबाबत माहिती देण्यात आली आहे. तर, येत्या तीन-चार महिन्याच्या कलावधीत हा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता जागतिक निर्यातीत भारताचा वाटा कमी आहे. जगाच्या तुलनेत भारताचा निर्यातीचा वाटा हा केवळ 2.5 टक्के इतकाच आहे. त्यामुळे हा वाटा येणाऱ्या काळात हा निर्यातीचा वाटा चार ते पाच टक्क्यांवर नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असणार आहे.
‘या’ शेतमालांची निर्यात होणार?
कृषी मालाची निर्यात वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी जागतिक बाजारात भारताच्या शेतमालांची निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी नव्या निर्यात धोरणानुसार द्राक्षे, डाळिंब, टरबूज, पेरू, हिरवी मिरची, शिमला मिरची, भेंडी, लसूण, कांदा, शेंगदाणे, काजू, म्हशीचे मांस, गूळ, नैसर्गिक मध आणि तूप या उत्पादनांच्या निर्यातीवर भर दिला जाणार आहे. सध्या निर्यातीसंदर्भातील कृती आराखड्यावर काम सुरु आहे. येत्या चार महिन्यात या कृती आराखड्याचे काम पूर्ण होऊन या उत्पादनांची निर्यात सुरु केली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय कृषी उत्पादनांना मागणी
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय शेतमालांना मोठी मागणी असून, या पार्श्वभूमीवर सरकारकडून कृती योजना तयार केल्या जात आहे. एवढेच नाहीतर, अमेरिका, मलेशिया, कॅनडा, रशिया, जर्मनी, फ्रान्स, कोरिया, चीन, इंडोनेशिया, जपान, इटली, बेल्जियम व यूके यासारख्या देशांना मोठ्या प्रमाणात भारतीय कृषीमालाची निर्यातदेखील केली जात आहे.