Yuva maratha news
आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्याचा झालाय खेळ नागरिकांना पंखे, कुलरची हवा घेण्याचा जमेना मेळ
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड : शहरात महावितरण कंपनीकडून केला जाणारा विद्युत पुरवठा थोडा जरी वारा सुटला किंवा पावसाचे चार थेंब पडले तरी लगेच बंद होतो. यामुळे सध्याच्या तप्त वातावरणात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तर दुसरीकडे मात्र महावितरण कंपनीला याचे थोडेही गांभीर्य असल्याचे दिसत नाही. महावितरण कंपनी विद्युत पुरवठ्याचा खेळ मांडला असल्याचे दिसत असल्याने तप्त उन्हात दिलासा मिळावा याकरिता नागरिकांना मात्र पंखे आणि कुलर लावण्याचा वेळ जमेना. महावितरण कंपनीची यंत्रणा गेल्या पाच दिवसापासून यावर काम करत असल्याचा दावा करत असली तरी अजूनही बीड शहरात कुठे चार पाच तास तर कुठे अर्धा तास तर कुठे दिवसभर लाईट नसते. महावितरणच्या या गलथान कामामुळे शहरात होणारा पाणीपुरवठाही अनेक दिवस उशिराने होत आहे. यामुळे नागरिकांना एकीकडे वीज नसल्याने पंखे व कुलर लावता येत नाही. तर दुसरीकडे भर उन्हाळ्यात पाण्याची निनांत आवश्यकता असताना पाणीपुरवठा लांबतच चालला आहे. कुठे २० तर कुठे २५ दिवसांनी नळाला पाणी येत आहे, यामुळे बीडकरांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे. बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांनी विद्युत बिघाडाची दखल घेऊन नळाला दोन दिवस उशिराने पाणी येणार असल्याचे पत्रक काढले होते. त्याला आता चार दिवस होऊनही महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहराच्या अनेक भागात अजूनही नळाला पाणी आलेले नाही. दरम्यान महावितरण कंपनीकडून विना खंड विद्युत पूरवठा होत नसल्याने शहरात थोडे जरी वारे सुटले किंवा पावसाचे चार थेंब जरी पडले की, बीड शहरवासीयांच्या मनात धस्स होतंय. कारण पटकन लाईट बंद होते यामुळे महावितरण कंपनीकडून सुरळीत विद्युत पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे.