आशाताई बच्छाव
परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना २२ लाखाचा गंडा
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/अंबाजोगाई दि: २३ मागील पाच-सहा वर्षातील व्यवहारांमुळे शेतकऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत दोघा व्यापाऱ्यांनी परळी तालुक्यातील नागपिंपरी येथील अकरा शेतकऱ्यांना तब्बल २१ लाख ६४ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी त्या दोन व्यापाऱ्यावर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पिंपरी येथील शेतकरी हनुमंत रुस्तम मुंडे यांच्या फिर्यादीनुसार अख्तर दस्तगीर पठाण रा. कसबा पेठ धारूर, अलीम कलीम शहा रा.पात्रुड ता. माजलगाव हे दोन व्यापारी त्यांच्या गावातून नेहमी कापूस खरेदी करीत असतात. कापूस विक्रीच्या निमित्ताने मागील पाच सहा वर्षांपासून हनुमंत मुंडे यांची त्यांच्यासोबत चांगली ओळख झाली. गतवर्षी त्या दोघा व्यापाऱ्यांनी दिवाळीपर्यंत पैसे घेण्यास थांबल्यास कापसाला प्रति क्विंटल १० हजार रुपये भाव देण्याचे आमिष दाखवले. यापूर्वी व्यवहारामुळे हनुमान मुंडे यांच्यासह, ज्ञानोबा भागवत, किसन कोल्हापुरे, बळीराम लक्ष्मण मुंडे, आत्माराम श्रीराम मुंडे, नवनाथ व्यंकटी शिंदे, मारुती ग्यानबा भोसले, विष्णू पाटील ढाकणे, रावण श्रीहरी मुंडे, बाबू रंगनाथ मुंडे आणि नवनाथ मुंडे यांनी एप्रिल जून या कालावधीत २१ लाख ६४ हजार रुपये किमतीचा २२५ क्विंटल कापूस त्या व्यापाऱ्यांना विश्वासाने दिला. मात्र हा कापूस शहागड येथील जिनिंगला नेऊन विक्री करूनही त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटूनही त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सदर तक्रारीवरून अख्तर दस्तगीर पठाण आणि अलीम करीम शहा या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुगे करीत आहेत.