आशाताई बच्छाव
महिलांचं कर्तृत्व मोठं; एक दिवस नव्हे रोजचाच दिवस महिलांचा – सौ. सीमाताई खोतकर
जालना । ब्युरो चीफ दिलीप बोंडे– महिलांचं कर्तृत्व मोठं आहे, केवळ आजचा एक दिवसच नव्हे रोजचाच दिवस हा महिलांचा आहे असे प्रतिपादन सौ. सीमाताई खोतकर यांनी येथे केले.
प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाच्यावतीने महिला दिनानिमित्त शुक्रवार (दि 8) रोजी शिवनगर येथील रेणुका माता मंदीर सभागृहात आयोजित महिला सन्मान कार्यक्रमात सौ खोतकर बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस कॉन्सीलचे राज्य सरचिटणीस महेश जोशी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष धनसिंह सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलताई गिरी यांची उपस्थिती होती. जिजामाता, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर दिपप्रज्वलनांने कार्यक्रमस सुरुवात झाली.
पंचवीस-तीस वर्षांपुर्वीच्या कार्यक्रमाप्रसंगीची एक आठवण सांगतांना सौ. खोतकर म्हणाल्या की महिलांच्याच एका कार्यक्रमात पहिल्यांदाच बोलण्याची वेळ माझ्यावर आली. त्यावेळी आधीच्या सर्व वक्त्यांचे भाषणे झाली असल्याने माझ्याकडे बोलण्यासारखे काही नव्हते. सर्वांंनी महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे म्हटले होते. त्यावर मी बोलतांना म्हणाले की, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर एक पाऊल पुढे आहेत. आज परिस्थिती त्याही पेक्षा पुढे गेलेली आहे. आज महिला धावतेय, सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. त्या-त्या क्षेत्रात कार्यरत महिला ह्या घर-चुल-मुल ही जबाबदारी पेलून कामाच्या ठिकाणी कार्यरत असते. महिलांचं कर्तृत्व मोठं आहे. त्यामुळे केवळ महिला दिन हा एकच दिवस महिलांचा नाही. तर रोजचाच दिवस आपला म्हणजेच महिलांचा असल्याचे सौ. खोतकर म्हटले. व सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.