आशाताई बच्छाव
भाषा आत्मसात करतांनाच देशाची ओळख होणे गरजेचे – मधुरा बावकर
नीळकंठ नगर वासियांतर्फे मधुराचा सत्कार
जालना(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने आपण ज्या देशात जातो तेथील भाषा आत्मसात करतांनाच त्या देशाची ओळख होणे देखील गरजेचे असते असे प्रतिपादन कुमारी मधुरा विजय बावकर हिने येथे बोलतांना केले.
जपान मध्ये शिक्षण घेवून भारतात परतल्यानंतर कुमारी मधुराला जपान मधील जपानी याझा की या पुणे येथील नामांकित कंपनीत नुकताच मोठया पदावर जॉब मिळाला आहे.या यशाबद्दल मधुराचा नीळकंठ नगर वासियांच्या वतीने काल रविवारी सायंकाळी गौरव करण्यात आला.या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ती बोलत होती.यावेळी पुढे बोलतांना मधुरा म्हणाली की,दहावी नंतर पुढे काय करायचे असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतो.प्रचलित शिक्षण घेण्याऐवजी काही तरी वेगळं करण्याचा सल्ला वडील विजय बावकर यांनी दिल्यानंतर पुढील शिक्षण जपानमध्ये घेण्याची इच्छा आई आणि वडील यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यांनी देखील मुलगी असतांनाही मला पूर्ण पाठबळ दिले.पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून जेएलपीटीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या आधारावर मला जपान मध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली असे सांगून मधुराने जपान मध्ये शिक्षण घेत असतांना आलेले चांगले,वाईट अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.जपान हा देश नेहमीच भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलेला असून सातत्याने होणाऱ्या भूकंपामुळे अनेक वेळा या देशाला मोठया आपत्तीला सामोरे जावे लागले असले तरी त्यातून अगदी कमी कालावधीत पूर्वपदावर येण्याची क्षमता असल्याचे देखील या देशाने जगाला दाखवून दिले आहे.तेथील स्वच्छ्ता,वाहतूक व्यवस्था, सहकार्य करण्याची तत्परता आदी अनेक चांगल्या गोष्टी खऱ्या अर्थाने आत्मसात करण्यासारख्या आहेत.






