आशाताई बच्छाव
जलसंपदाच्या पेपरफुटी प्रकरणी टी. सी. एस टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेस कंपनीची चौकशी करा
धागेदोरे महाराष्ट्रात असण्याची शक्यता : युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा
वाशिम,(गोपाल तिवारी)- २७ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत टी. सी. एस टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेस या खाजगी कंपनीकडून स्थानिक गुलाटी टॉवरमध्ये जलसंपदा विभागाच्या परिक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणात एका महिला परिक्षार्थीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचे धागेदारे महाराष्ट्रात पसरलेले असण्याची शक्यता आहे. या बाबीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी टी. सी. एस टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेस या खाजगी कंपनीची चौकशी करुन यातील मुख्य सुत्रधारांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी युवासेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांच्या नेतृत्वात व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, विरोधी पक्षनेते, पोलीस आयुक्त आदींना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, येथील गुलाटी टॉवर येथे टी. सी. एस टाटा कंसल्टंशी सर्व्हिसेस या कंपनीकडून जलसंपदा विभागाचे परिक्षा पेपर घेण्यात आले होते. यादरम्यान२७ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या परिक्षेमध्ये अमरावती येथील विद्यार्थीनी कु. रश्मी सुरेशराव ठाकरे हिला पेपरमध्ये कॉपी करतांना पकडण्यात आले व तिच्यावर वाशिम येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सदर युवतीकडे त्या दिवशीच्या पेपरची प्रत कोठून आली हा महत्वाचा प्रश्न आहे. वर्षभर विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करुन परिक्षेत चांगले गुण मिळावे म्हणून जिवापाड प्रयत्न करतात. मात्र या पेपरफुटी मुळे मेहनत करणार्या विद्यार्थ्याच्या मेहनतीवर पाणी फेरल्या जाते. व त्यांचे वर्ष वाया जाते. अत्यंत काटेकोर नियोजनात व सुरक्षेत खाजगी कंपनीकडून घेतल्या गेलेल्या परिक्षेत झालेल्या पेपर फुटी प्रकरणी सदर कंपनीच्या कर्मचार्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यातील मुख्य सुत्रधारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. खोलवर चौकशी केल्यास संपुर्ण अमरावती विभागात हा पेपर फुटीचा मोठा घोटाळा उघडकीस येवू शकते. सदर गैरप्रकार हा परिक्षेच्या खाजगीकरणामुळेच झाला आहे. यामुळे चांगल्या विद्यार्थ्याच्या भविष्याला धोका पोहचत असून असे पुन्हा होवू नये यासाठी सदर विद्यार्थीनीची सखोल चौकशी करुन याचा मास्टरमाईड व सुत्रधाराला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ठेंगडे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देतांना अजय रणखांब, केदारनाथ रणखांब, दत्ता काळबांडे, रुपेश रणबावळे, नितीन अढाव, राजु गायकवाड, पुंजाजी खुनारे आदी उपस्थित होते.