आशाताई बच्छाव
भारतीय राष्ट्रध्वज तसेच राष्ट्रगीताविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ देशद्रोहाचा खटला दाखल करा.
पुणे ब्युरोचिफ: उमेश पाटील
अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडणार; संभाजी ब्रिगेडचा इशारा.
भारतीय राष्ट्रध्वज तसेच राष्ट्रगीताविषयी संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशविघातक वक्तव्य करून देशातील शांतता भंग तसेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचा त्यांनी अवमान केला आहे. त्यामुळे संभाजी भिडेंवर तात्काळ देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आगामी काळात महाराष्ट्रभरात तीव्र आंदोलन छेडणार येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी चिंचवड शहरातील दिघी येथे रविवार दि. 25 जून 2023 रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानात बोलताना भिडे म्हणाले की, “15 ऑगस्ट हा काळा दिवस आहे. भारतीय राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रगीत असूच शकत नाही तसेच तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज नाही.15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा. असे वादग्रस्त वक्तव्य करून भिडेंनी भारतीय राष्ट्रध्वज तसेच राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. त्यांच्या या विखारी, देशविघातक भाषणामुळे पुन्हा एकदा भारतीय अस्मिता असणाऱ्या राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज, राष्ट्रीय महापुरुष तसेच देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांचा यामुळे घोर अपमान झालेला आहे. भिडेंच्या या आपत्तीग्रस्त वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भिडे यांनी यापूर्वीही अनेक वेळा देश विघातक वक्तव्य केलेली आहेत. आत्ताचे वक्तव्य देखील त्यांनी जाणीवपुर्वक देशात व महाराष्ट्रात दंगली घडविण्याच्या उद्देशाने केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशात व महाराष्ट्रात अराजकता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या भिडेंवर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. भिडेंवर राष्ट्रीय प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 या कायद्या अंतर्गत तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. अशा आशयाच्या तक्रारीचे निवेदन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे, जिल्हा उपाध्यक्ष संजय जाधव, शहर अध्यक्ष सतीश काळे,शहर सचिव रवींद्र चव्हाण,शहर संघटक सुभाष जाधव,शहर कार्याध्यक्ष निरंजन सोखी, उपाध्यक्ष अभिषेक गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.