आशाताई बच्छाव
रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारीणी निवडणुकीत सोलापूरचे राजाभाऊ सरवदे यांची राज्य अध्यक्ष पदी निवड मुंबई,( ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र् राज्य कार्यकारीणीची निवडणूक रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत पुणे येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. रिपाई च्या राज्य कार्यकरिणीच्या अध्यक्ष पदी राजभाऊ सरवदे ( सोलापूर ) यांची निवड करण्यात आली. रिपाईच्या राज्य अध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे, राज्य कार्याध्यक्षपदी बाबुराव कदम ( औरंगाबाद) राज्य सरचिटणीस पदी गौतम सोनवणे ( मुंबई), राज्य संघटन सचिव पदी परशुराम वाडेकर(पुणे), राज्य संघटक पदी सुधाकर तायडे ( विदर्भ ), राज्यउपाध्यक्ष पदी अण्णासाहेब रोकडे (कल्याण ) या 6 जणांची निवड करण्यात आली अशी अधिकृत घोषणा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी काम पाहिले यावेळी माजी आमदार सुमंतराव गायकवाड उपस्थित होते.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या रिपाई च्या राज्य कार्यकारिणीच्या निवडणूकीला राज्यभरातून सर्व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. रिपाई च्या राज्य कमिटीमध्ये एकूण 54 जणांची निवड होणार असून 18 निमंत्रित सदस्यायाची ही नियुक्ती करण्यात येणार आहे अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी केली.
रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारीणीमध्ये महाराष्ट्रतील सर्व प्रदेशांना समान संधी देण्यात येत असून सर्व जाती-धर्मीयांना या कार्यकारीणीमध्ये समान संधी देण्यात येणार आहे.
रिपाईची राज्य कार्यकारीणीचा कालावधी 5 वर्षांचा असून दर 5 वर्षांनी कार्यकरिणीच्या निवडणुका घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याकडे रिपाईचे लक्ष राहील असे ना.रामदास आठवले म्हणाले.
रिपाईचे मावळते राज्य अध्यक्ष भुपेश थुलकर या बैठकीला उपस्थित होते. मागील राज्य कार्यकरिणीमध्ये राजा सरवदे हे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते त्यांना आता राज्य अध्यक्ष पदी बढती देण्यात आली. तर बाबुराव कदम यांना दुसऱ्यांदा राज्य कार्यकारीणीच्या कार्याध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. तर रिपाईचे मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे यांना बढती देऊन त्यांची महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या राज्य कमिटीच्या निवडणुकीची प्रक्रियेत रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूमिका बजावली. तसेच रिपाईचे कायदे विषयक सल्लागार ऍड बी के बर्वे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले.
यावेळी राज्यभरातील क्रियाशील कार्यकर्त्यांनी बालगंधर्व रंग मंदिर तुडुंब भरले होते. रिपाईचे पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे, यशवंत नडगम, असित गांगुर्डे, सुरेश बारशिंग यांनी मान्यवरांचे भव्य पुष्पहार देऊन अभिनंदन केले.