आशाताई बच्छाव
एका रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई! मात्र नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा सुरुच..
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज)
संग्रामपुर :- तालुक्यात राजरोसपणे सर्रास रेतीची चोरी करणे सुरु आहे.
वान नदी पात्रातील : कोट्यवधीचा महसूल पाण्यात, जनता त्रस्त व प्रशासन मस्त अशी अवस्था आहे . संग्रामपुर तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे मात्र अवैद्य रेती उत्खनन करणाऱ्यांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी मौन धारण केलेले दिसून येते. आणि तालुक्यातील मंडल अधिकारी हे महाभारतातील धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहेत. वान नदीला मोठ्या प्रमाणात पूर गेल्यामुळे रेती माफीयांनी अवैधरित्या उत्खनन करून मोठमोठे पाडलेले नदीपात्रातील खड्डे सर्व भरून निघाले होते. परंतु वान नदीचे वाहते पाणी थांबताचं गेल्या तीन चार दिवसापासून
वान नदी पात्रातून पुन्हा रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरु करण्यात आला आहे. महसूल प्रशासनाचा तसेच ग्राम दक्षता समितीचा सुद्धा येथे आशिर्वाद आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. अवैद्य रेती उपसा सुरु प्रकरणी संबंधित दक्षता समिती, तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासन यांच्यावर दबावतंत्र की अर्थकारण आहे, हा संशोधनाचा विषय असुन. प्रशासनाने रेती तस्करांसमोर नांगी टाकल्याचे चित्र दिसत आहे.
संग्रामपुर तालुक्यातील रेती घाटांतून अवैध रित्या रेतीची चोरी करणे सुरु आहे.नदी पात्रात ट्रॅक्टर घालून मजूरांच्या माध्यमातून रेती नदीकाठावर डम्पींग केली जाते. त्यानंतर ती जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरली जाते. दररोज राजरोषपणे अवैध रेतीचे ट्रक व ट्रॅक्टर द्वारे नदीघाटारतुन रेतीची वाहतूक होत आहे. महसूल प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे. आतापर्यंत शेकडो ट्रक रेतीचा उपसा करुन रेतीची विल्हेवाट लावण्यात रेती तस्कर यशस्वी झाले आहेत. काही रेती तस्करांन सोबत महसूलच्या काही लोकांचे पार्टनरशिप सुद्धा असल्याची चर्चा आहे. तालुका पातळीवर रेती तस्करीवर आळा बसवण्यासाठी असलेल्या भरारी बदकातून नदीपात्रात जाण्याआधीच तस्करांना फोन द्वारे माहिती दिल्या जातो हा सर्व प्रकार पथकातील लोकांचा मोबाईल चेक केल्यास व त्यांच्या मोबाईल नंबरची वरिष्ठांनी दखल घेत सीडीआर चेक केल्यास त्यांचा संपर्क जास्तीत जास्त रेती माफियांसोबतच दिसून येईल हे तेवढेच खरे. कारण रात्रंदिवस काकणवाडा येथून वान नदीपात्रातून राजरोजपणे अवैद्य रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू आहे परंतु संबंधित तलाठी मंडल अधिकारी हे मुख्यालयी राहत नसल्यामुळे एखाद्या महसूल मित्रांनी किंवा सुज्ञ नागरिकांनी अवैद्य रेतीची माहिती दिल्यास त्यांना संबंधितांकडून मी शेगावला राहतो आता येऊ शकत नाही सकाळी येणार असे उत्तर मिळते आणि सकाळी आल्यावर येण्याआधी रेती माफियाला त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगून आम्ही नदी पात्रात वाहन पकडण्यासाठी येत आहोत अशी माहिती दिली जाते. त्यामुळे तालुक्यात शांतता भंग होण्यास कारणीभूत हेच अधिकारी ठरु शकतात.या सर्व प्रकाराला वेळीच आळा बसावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून व सामान्य नागरिकांमधून होत आहे. कारण हे स्पष्ट होते की भरारी पथक आल्यानंतर एकही वाहन त्यांच्या हातात का लागत नाही कारण पथकातील लोकांची माफिया सोबत मिली भगत असल्यामुळे रेतीमाफीयांना आधीच माहिती दिलेली असते हे तेवढेच सत्य आहे. सर्रास रेती चोरी सतत सुरु असतांना महसूल प्रशासनाकडून आतापर्यंत चौकशी झाली नाही. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा यासंदर्भात अजूनपर्यंत दखल घेतली नसल्याचे समजते. येथील रेती उपसा दबावतंत्रा मुळे की अर्थकारणामुळे सुरु आहे हा संशोधनाचा विषय आहे.रेती उपसा व रेतीचोरी संदर्भात अनेक कडक नियम आहेत परंतु कारवाई होत नाही. पर्यावरणाला नुकसान पोहचत आहे. नदी घाट बचावाकरीता कुणीच वाली नाही. पर्यावरण प्रेमीही जीवाच्या भीतीने येथे समोर येत नाही. नियम केवळ कागदोपत्री येथे दिसत आहे. केवळ उंटावरुन शेळया हाकण्याचा प्रकार येथे सुरु आहे. गुणवत्ता प्राप्त व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज आहे. रेतीची सर्रास चोरी होत असतांना दररोज अवैद्य उत्खनन चालू असून सुद्धा कित्येक दिवसापासून रेती उत्खनन करणाऱ्या वर कारवाई नाही परंतु एक-दोन दिवसाआधी रेती माफियांमध्येच मी मी तू तू झाल्यामुळे नदीपात्रात रेती उत्खननाच्या जागेवरून झालेल्या वादामुळे महसूल डिपार्टमेंट पर्यंत सदरची माहिती मिळाल्यामुळे त्या माफियांमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून माफियांच्या हितासाठीच तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी नायब तहसीलदार उकर्डे, मंडळ अधिकारी बोराखडे, तलाठी कुसळकर , तलाठी खरे व कोतवाल खिरोडकार त्यांच्या पथकाने दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:45 च्या दरम्यान एक 407 टिप्पर अवैध वाहतूक करतांनी पकडले व वाहन चालकास रॉयल्टी विचारली असता रॉयल्टी आढळून आली नसल्याने वाहनाचा पंचनामा करून वाहन क्रमांक MH30 BD 0601 रेतीने भरलेले टिप्पर पोलीस स्टेशन तामगाव येथे लावण्यात आले व पुढील कारवाई करता तहसीलदार वरणगावकर यांच्याकडे प्रकरण दाखल करण्यात आल्याची माहिती मंडल अधिकारी बोराखडे यांनी दिली परंतु तालुका भर नदी नाल्यांमध्ये अवैद्य रेती उत्खनन जोमाने सुरू असल्यानंतर सुद्धा संबंधित अधिकारी हे फक्त नाममात्र कार्यवाही करून मोकळे होतात. येथील महसूल ची कार्यवाही म्हणजे उचलली जीभ लावली टाळूला असेच म्हणावे लागेल अशा प्रकारे कार्यवाही करून पुन्हा कुंभकर्णी झोपेत हे अधिकारी जातात असे बरेच वेळ पहावयास मिळत आहे हे विशेष.
त्यामुळेच टुनकी, बावनबीर, सोनाळा, पंचाळा,वडगाव वान, काटेल कोलद, काकनवाडा, रिंगणवाडी, वानखेड, या गावातील वान नदीपात्रात चालू असलेले अवैद्य रेती उत्खनन व नदीवरील रेती वाहतूक गाववासियांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गावापासून एक किमी अंतरावर नदीचे पात्र आहे. गावकऱ्यांना स्मशानभूमी व शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी, गुरांना चारण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो.परंतू रेती वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावरून दिवसभर अवैद्य रेती वाहतूकीची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून पावसाच्या पाण्यामुळे डबके साचले आहेत. काही दिवसाआधी अशाच प्रकारे अवैधरीत्या उत्खनन करून नदीपात्रात पडलेला खड्डा न दिसल्याने तालुक्यातील काथरगाव येथील नदीत एका तरुण शेतमजुराचा पाण्यात डुबून मृत्यू सुद्धा झालेला आहे. तरीसुद्धा निर्दयी बेजबाबदार असा संबंधित विभाग जागे झाला नाही. या रस्त्याने दुचाकीने व पाऊलवाटीने चालणे सुद्धा शक्य नाही. याबाबत तक्रारी सुद्धा गावकरी करण्यास घाबरत आहे कारण संबंधित अधिकारी हे रेती माफियाला त्या गावकऱ्यांचे नाव सांगून त्यांच्या जीविताला धोका निर्माण करू शकतात असे काही गावकऱ्यांकडून बोलल्या जात आहे.
मागील काही दिवसांपासून वरील गावातून भरधाव वेगाने ओव्हरलोड रेतीने भरलेले ट्रॅक्टर धावत असून गावातील रस्त्यांवर रेतीचे थर जमा होवून अपघातास आमंत्रण मिळत आहे. त्यामूळे गावकरी त्रस्त असून संबंधित अधिकाऱ्यांचे अवैद्य रेती उत्खनन करणाऱ्या वर जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत. याकडे गांभीर्याने जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी लक्ष देण्याची मागणी संबंधित गावकऱ्यांनी केली आहे.