आशाताई बच्छाव
शेवडी येथील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक
ब्यूरो चिफ:-शत्रुघ्न काकडे पाटील (युवा मराठा न्युज नेटवर्क)
जिंतूर (परभणी):-तालुक्यातील शेवडी येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून पैसे न देताच खरेदीदार व्यापाऱ्याने पोबारा केल्याचा प्रकार दीड वर्षापूर्वी घडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार संशयित आरोपींच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर यातील मुख्य संशयित आरोपी दोन दिवसांपूर्वी पुणे येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
त्यास गुरुवारी (ता. २३) येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. थोडेफार हाती आलेल्या शेतमालावर काही व्यापाऱ्यांनी डल्ला मारला. असाच प्रकार येलदरी येथील व्यापारी अमोल एकसिंगे यांनी डिसेंबर २०२० मध्ये शेवडी येथील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन लाखो रुपयांचे सोयाबीन खरेदी केले होते. परंतु, खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे न देताच पोबारा केला, त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन सदरील व्यापाऱ्यांच्या विरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मात्र,
तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी गुन्हा दाखल केला नव्हता. दरम्यान, शेवडी येथील बालाजी आश्रोबा घुगे यांच्या फिर्यादीवरून अमोल अप्पा एकसिंगे, बाळू अप्पा एकसिंगे, विलास राठोड, विनोद वाव्हळे यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी फरार झाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी इतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.