राजेंद्र पाटील राऊत
जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ तर तिघांचा मृत्यू
(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ७ ते१० असे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत होते परंतु शनिवारी हा आकडा १९ च्या घरात गेला. मागच्या काही दिवसांतील कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची ही मोठी संख्या असल्याने, तसेच चोवीस तासांत तीन बाधितांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेचे डोळे विस्फारले आहेत. शनिवारी कोल्हापूर शहरातील साळोखेनगर येथील ८७ वर्षीय पुरुषाचा, तर नागाळापार्क येथील ८३ वर्षीय महिलेचा येथील खासगी रुग्णालयात, तर इचलकरंजी येथील ५७ वर्षीय पुरुषाचा येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला.
शनिवारी जे १९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले त्यापैकी १३ रुग्णांची कोरोना चाचणी खासगी लॅबमध्ये झाली, तर सहा रुग्णांची तपासणी शासकीय लॅबमध्ये झाली. आतापर्यंत जिल्ह्यात ५० हजार १७४ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या असून, त्यापैकी ४८ हजार २८६ पूर्ण बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. १७३६ जणांचा मृत्यू झाला. सध्या १५२ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
कोरोनाचा कहर कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवला आहे. त्याची भयानकता, उपचारात येणाऱ्या अडचणी, तोकडी पडणारी यंत्रणा, अनेक कुटुंबांची झालेली फरपट या सगळ्या वास्तव वातावरणातून जाण्याचे दुर्भाग्य कोल्हापूरकरांच्या नशिबी आले होते. त्यामुळे पुन्हा हे संकट ओढावून घेणे महागात पडेल. प्रशासनाने दिलेल्या काटेकाेरपणे पालन करावे, येणारे संकट प्रशासनावर नाही तर आपल्या स्वत:वरच आहे याची जाणीव नागरिकांनी ठेवावी लागेला.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .