आशाताई बच्छाव
शाळेचा निरोप घेताना
निरोपाचा क्षण जणू,
हळव्या त्या फुलांचा…
आठवणींची गर्दी जणू,
क्षण हा विरहाचा…
शाळेचं सभागृह गच्च भरलं होतं. बाई बोलत होत्या माझ्या दहावीच्या लाडक्या विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनीनो, आज तुमच्या शाळेचा शेवटचा दिवस. माझं मन मात्र भूतकाळात जात होतं आणि अश्रूंनी डोळ्यात गर्दी केली होती. काय गंमत आहे पहा, या शाळेत येताना होती मनात अनामिक भीती आणि आज तिला सोडून जाताना मनात फक्त निस्सीम भक्ती! मनात आठवणी खूप साठल्या आहेत. गाडीला काचेवरचा पाऊस पुसण्यासाठी वायपर असतात, आज माझ्या मनाच्या काचेवर भावनांचा पाऊस पडतोय तो पुसण्यासाठी कोणता वायपर आणू? कळतच नाही. मला आठवते ते रुसणं, रडणं, ते एकमेकींना चिडवणं, बाईंना थापा मारणं, एकत्र अभ्यास करणं, स्पर्धांमधलं ते जिंकणं ते हरणं! आज मी जेव्हा विचार करते की या शाळेने मला काय दिलं तेव्हा मनोमन असं वाटतं की तिने मला काय दिलं नाही! सगळं काही हिनच दिलं. माझ्या अज्ञानावर हिनं ज्ञानाचे लेखन केलं. त्या प्रार्थनेच्या टोपल्याबरोबर गप्प बसण्याची शिस्त लावून मनाची एकाग्रता साधायला शिकवलं. स्वच्छतेचे धडे हिनेच दिले. हिनेच मला दिल्या जिव्हाळ्याच्या शिक्षिका! विद्यार्थि घडविण्यात तन-मन धन एकत्र करणाऱ्या मातीच्या गोळ्यातून सुबक मूर्ती आकारणाऱ्या याच शाळेत मला अनेक जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. आम्ही नुसते डबेच नाही तर मनातली सुखदुःखही वाटली. शाळेतील दिवस बनले, स्मरणाच्या पुस्तकातील पाने…
विद्याधनम् l सर्वधनप्रधानम् ll शाळेत शिकलेले सर्व विसरुनही जे शेवटी लक्षात राहते, तेच खरे शिक्षण. शाळा सोडण्याचा क्षण जवळ येतोय. भावनांचा सर कुणीतरी हलकेच काढून घेतय असं वाटतय. खरोखर आज मला कळलय, भेटीच्या पोटीच असतात ताटातुटी. आज माझं क्षेत्र क्षितिजापेक्षाही विस्तारलं आहे. पण त्या क्षितिजापर्यंत माझी नजर पोहोचवली आहे ह्या मातेन.भावी आयुष्यात मी यशोमंदिराच्या पायऱ्या चढत जाणार आहे पण त्या मंदिराचा महामार्ग दाखविला आहे या माझ्या शाळारुपी आईन. अशा या मायमाऊलीचा, ज्ञानजननीचा हा दुःख निरोप! छे! छे! मी निरोप नाही रोप घेणाऱ या शाळेतून ज्ञानाचे, बुद्धीचे आणि ते लावणार जगाच्या विशाल प्रांगणात आणि ते मी उत्तरोत्तर विकसित करणार. या शाळेतील प्रेमाची अनुभवांची, मायेची शिदोरी मला आयुष्यभराच्या प्रवासाला नक्कीच पुरणार आहे.
स्मृतींची चाळता पाने, बाष्पांध होती लोचने,
मनांच्या आठवणी, कधीही पुसल्या न जाती.
सगळ्या मैत्रिणी वर्गात जाण्यासाठी उठल्या आणि त्यांनी मला तंद्रीतून जागे केले. खरोखर असा होता माझ्या शाळेचा निरोप समारंभ अविस्मरणीय! अतुलनीय!!
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत नेहमी नवी दिशा असावी…
सविता तावरे
युवा मराठा न्यूज-मुंबई स्पेशल रिपोर्टर
महाराष्ट्र भूषण न्यूज-मुंबई प्रतिनिधी
स्वराज्य पोलीस मित्र संघटना
(संचालक तथा मुंबई अध्यक्षा)
ग्राहक सेवा संस्था-मुंबई महिला अध्यक्षा