आशाताई बच्छाव
मराठी राजभाषा दिन
मराठी भाषेचा इतिहास फार प्राचीन आहे.अनेक शूरवीरांच्या बलिदानाने आपला महाराष्ट्र बनलेला आहे.१९६४ साली मराठी भाषेला महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा म्हणून घोषित करण्यात आले.२७ फेब्रुवारीला आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो.मराठी अतिशय सुंदर भाषा आहे.जगभरात बोलल्या जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही १० व्या क्रमांकाची भाषा आहे.अनेक मोठमोठ्या लेखकांनी आपल्या लिखाणाने मराठी भाषेच्या सौंदर्यात भर घातली आहे.शिवरायांमुळे आज मराठी भाषा आणि महाराष्ट्र टिकून आहे.मराठी फक्त एक भाषा नव्हे तर ममतेचे आणि संस्कारांचे बोल त्यात आहेत.
आपण जन्मापासून आपल्या दैनंदिन जीवनात ज्या भाषेचा वापर करतो ती आपली मातृभाषा असते.मुलांचा सर्वांगीण विकास मातृभाषेतून होत असतो.आपल्याला अन्य भाषा आत्मसात असल्या तरी आपल्या मातृभाषेचा विसर पडता कामा नये.आपली मातृभाषा आपले संस्कार,आपली संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेत असते.मराठी भाषा महाराष्ट्र राहणाऱ्या लोकांना आपल्या आईसमान प्रिय आहे.
माझ्या मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिका मेळविन
अशा सुंदर शब्दांत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचे गोडवे गायले आहेत.मराठी भाषेत अनेक संतांनी ग्रंथ लिहिले आहेत.आपल्या मराठी भाषेत भरपूर ज्ञान उपलब्ध आहे.
दुस-यांनाही आपल्या भाषेचा आदर वाटावा याकरिता आपल्या दैनंदिन जीवनात इतरांशी बोलताना मराठी भाषेचा जास्तीतजास्त उपयोग करायला हवा.जगातील कुठलीही व्यक्ती तिच्या मातृभाषेत चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकते.पण हल्ली पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतात.मराठी भाषेसोबत इंग्रजी भाषा येणे आज तितकेच महत्वाचे असले तरी आपल्या मराठीचे महत्त्व कमी व्हायला नको.आपली मराठी भाषा किती सुंदर आहे हे पालकांनी मुलांना पटवून दिले पाहिजे.आपल्या मातृभाषेचे संवर्धन करणे आपल्याच हातात आहे.ते आपले कर्तव्य आहे.आता महाराष्ट्रात मराठी विषय सर्व शाळांमध्ये महत्वपूर्ण केला आहे.मराठी भाषा महाराष्ट्राची शान आहे.मराठी भाषा इंग्रजी भाषेपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही.मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचे काम मातृभाषा करते.आपल्या महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी मराठी भाषेचा विकास होणे गरजेचे आहे.मातृभाषेचा प्रसार केला तरच महाराष्ट्राची प्रगती होईल.लहान मूल आपले पहिले बोबडे बोल मातृभाषेतूनच बोलतो.त्यामुळे पुढे आपण दुसऱ्या भाषा शिकलो तरी मातृभाषेला आपण कधीच विसरू शकत नाही.आपल्या मनात तिच्याबद्दल मानाचे स्थान असते.आनंद,दु:ख या प्रसंगी आपल्या ओठी शब्द येतात ते मातृभाषेतूनच.मराठी भाषेला फार मोठी परंपरा लाभली आहे.मराठीचा पहिला आद्य ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला जातो.भारतीय साहित्यात मराठी साहित्याला मानाचे स्थान आहे.मराठीतील साहित्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद केला गेला आहे.मराठीचे शब्दभांडार समृद्ध आहे.आज मराठी भाषेची स्थिती दयनीय आहे.अनेक मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत.मराठी शाळाच बंद पडतील तर मराठी समृद्ध कशी होणार?हल्ली जो-तो आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतो.पाल्यापेक्षा पालकांनाच इंग्रजी शाळांचे वेड लागले आहे.परंतु शिक्षणतज्ज्ञांचे असे मत आहे की मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले तर कुठलीही गोष्ट त्यांच्या लवकर लक्षात येते.म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने आकलन नीट होते.आपण काय शिकतोय हे चांगल्या प्रकारे समजते.त्यामुळे व्यक्तीचा विकास होण्यास मदत होते.आजच्या काळात इंग्रजी येणे जरी महत्वाचे आहे तरी मराठी भाषा त्यांना बोलता,लिहिता आलीच पाहिजे.पहिले ज्ञानभाषा मराठी असायला हवी.अनेकांना मराठी बोलणे कमीपणाचे वाटते.पण त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपली मराठी अतिशय प्रगल्भ भाषा आहे,साहित्याने परिपूर्ण अशी भाषा आहे.आता हेच बघा ना! आपल्या मराठीत एकाच शब्दाचे किती सुंदर अर्थ आहेत.सुंदर, अप्रतिम, अतुल्य, अवर्णनीय अश्या शब्दांना इंग्रजीत फक्त व्हेरी गुड,नाईस,फाईन असे थोडकेच शब्द आहेत.इंग्रजीतील साॅरी शब्दाला मला माफ करा याची सर नाही.आपल्याला मराठी बद्दल आपुलकी निर्माण व्हावी असे वाटत असेल तर सोशल मीडियावरही आपण आपल्या मराठी भाषेचा वापर करायला हवा.आपलं मराठी आपणच जपायला हवं.माझी मराठी गुणाची आहे.तिला जपण्यासाठी आपणच हातभार लावला पाहिजे.आपण तिला नेहमी आदराचे स्थान देऊन इतरांशी मराठीतूनच बोलण्याचा अट्टाहास धरायचा.मराठी भाषेत काही बोलीभाषा सुद्धा आहेत.जसे कोंकणी, अहिराणी, कोल्हापुरी, खान्देशी,नागपुरी,मराठवाडी इत्यादी.आज आपण बघतो की सर्वच क्षेत्रात इंग्रजी शिवाय पर्याय नाही.कारण महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण इंग्रजीतून होते.शिक्षण घेतल्यानंतर काही विद्यार्थी
उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी देशाच्या बाहेर जातात.तिथे इंग्रजीशिवाय पर्याय नसतो.तरीसुद्धा आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा.प्रत्येक मराठी माणसाला मराठी लिहिता,वाचता, बोलता यायलाच हवं.मराठी फक्त बोलून होणार नाही तर तिला लिहून अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील घराघरांत मराठी बोलली जाते.परंतु वाढत्या इंग्रजी भाषेच्या आकर्षणामुळे मराठी भाषा जपणे काळाची गरज आहे.आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला मातृभाषेशी जुळून राहणे महत्त्वाचे आहे.मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण मराठीचा, आपल्या मातृभाषेचा अधिकाधिक प्रमाणात वापर करायलाच पाहिजे.काळानुसार बदलावे लागते मान्य.पण या सर्व गोष्टींमध्ये आपली मायबोली जपणे तितकेच महत्त्वाचे आहे.
लैलेशा भुरे
नागपूर