आशाताई बच्छाव
शहरातील पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी धरणे आंदोलन करणार – अक्षय गोरंटयाल
–जालना,(प्रतिनिधी दिलीप बोंडे)—-——————————शहरातील पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करून जनतेला मुबलक व शुद्ध पाणी पुरवठा करावा नसता येत्या ३१ जानेवारी बुधवार रोजी जालना शहर महानगर पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी दिला आहे.
जालना शहरातील जवळपास सर्वच भागात पाणी पुरवठा वितरणाचे नियोजन कोलमडले असून अनेक भागात १५ ते २० दिवसाला पाणी पुरवठा होत आहे.जालना शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावण्यासाठी जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांच्या विशेष प्रयत्नाने आणि सत्तेत असूनही आपल्याच सरकार विरुद्ध त्यांनी केलेल्या टोकाच्या संघर्षानंतर जायकवाडी योजनेचे पाणी जालना शहराला मिळाले आहे.मात्र,असे असले तरी महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे पाणी पुरवठा वितरणाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून आत्ताच शहरातील जनता विशेषतः महिला भगिनींना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे ओढवली असल्याचा आरोप युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी केला आहे.महानगर पालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराचा जलदगतीने विकास होईल असा दावा महानगर पालिकेचे समर्थन करणाऱ्या काही नेत्यांनी केला होता.मात्र,विकास तर सोडाच पूर्वी सुरळीत होत असलेल्या पाणी पुरवठा वितरणाचे नियोजनही बिघडल्याचा आरोप करून शहरातील स्वच्छतेकडेही महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.शहरातील कोलमडलेला पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करून स्वच्छतेकडेही गांभीर्याने लक्ष घालावे नसता येत्या ३१ जानेवारी बुधवार रोजी जालना शहर महानगर पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.