आशाताई बच्छाव
महिलांनी स्वतःसाठी वेळ देऊन मुलांवर चांगले संस्कार करावेत
सारोळे खुर्द येथे अष्टभुजा महिला मंडळाचे हळदीकुंकू समारंभात मा सभापती सुवर्णाताई जगताप यांचे प्रतिपादन–
सारोळे खुर्द येथे अष्टभुजा महिला मंडळ आयोजित हळदी कुंकू समारंभ उत्साहात —
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये महिलांनी चुल आणि मुल या जुन्या रुढी परंपरेला परंपरेला फाटा देत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबाच्या जबाबदारी बरोबरच आपल्या मुलांना चांगले शिक्षण चांगले संस्कार व चांगले मार्गदर्शन करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. महिलांना गृहमंत्री म्हटले जाते परंतु घर चालवणे पाहिजे तितके सोपे नसून आपल्या मुलांवर संस्कार करून मुलांमध्ये आपल्या राहिलेल्या इच्छा ,स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मा सभापती सुवर्णाताई जगताप यांनी केली आहे.
सारोळे खुर्द येथे ग्रामपंचायत व अष्टभुजा महिला मंडळाच्या वतीने आयोजित हळदी कुंकू समारंभात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ मीनाताई जेऊघाले होत्या तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मा सभापती सुवर्णताई जगताप (कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव), सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ विमल दत्तात्रय डुकरे, लासलगाव आगार प्रमुख सौ सविता काळे मॅडम, पिंपळगाव महाविद्यालयाच्या प्रा छाया तिडके, सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका सौ उमा (अर्जुन) चव्हाण, नवनियुक्त पोलीस पाटील प्रियांका कृष्णा जाधव, अष्टभुजा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ वनिता ईश्वर जाधव, खानगाव पोलीस पाटील सौ वाघ आदी होते.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा यावेळी अष्टभुजा महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यथोचित सन्मान केला. वनसगाव विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री) अर्जुन चव्हाण यांना रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग यांच्या वतीने मानाचा व सन्मानाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल व नवनियुक्त पोलीस पाटील सौ प्रियांका कृष्णा जाधव यांचा अष्टभुजा महिला मंडळ व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नवनियुक्त पोलीस पाटील सौ प्रियांका कृष्णा जाधव यांनी हळदी कुंकू समारंभ घेण्याचे उद्दिष्ट व महिलांनी एकत्र येण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असल्याचे सांगून प्रास्ताविकात महिलांना उद्बोधन करताना महिलांनी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. अष्टभुजा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वनिता जाधव यांनी आपल्या मनोगतात हळदीकुंकू समारंभाला
सारोळे खुर्द ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व ग्रा पं सदस्य तसेच विकास संस्थेच्या संचालकांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शब्द सुमनांनी त्यांची स्वागत केले. त्याचप्रमाणे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यामागचा उद्देश व महिलांच्या स्वातंत्र्याचा विचार होऊन संवाद साधावा या दृष्टीकोनेतून करण्यात आला आहे असे सांगितले. सौ अश्विनी केदारे यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या जबाबदारीची जाणीव करून देताना महिला वर्गाने भावी काळासाठी काय नियोजन केले पाहिजे याबाबत सविस्तर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास उपस्थित पिंपळगाव महाविद्यालयाच्या प्रा छाया तिडके यांनी आपल्या मनोगतात हळदी कुंकू समारंभ का घेतला…जुन्या काळातील महिलांना घराबाहेर पडताना अडचणी, समाजसुधारकांनी या जाचक रुढी परंपरा…सुख दुःख..महिला समस्या, आजची स्त्री ,स्त्री सौभाग्याचे प्रतीक स्त्री वर्गाशी निगडीत प्रथा तश्याच राहिल्या..एकमेकींच्या दुराभाव -संघर्ष…थेट संवाद –व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रा पं … स्वतः साठी वेळ दिला पाहिजे, सकाळी उठल्यावर स्वतः शी हितगुज — मुलांना संस्कार दिले पाहिजे .शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी… जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उध्दारी अश्या समर्पक भाषेमध्ये मनोगत व्यक्त केले.सौ सविता काळे लासलगाव आगार व्यवस्थापक यांनी यावेळी सांगितले की, शिक्षणामुळे आपण सक्षम होतो. भावी काळाच्या व आरोग्याच्या दृष्टीने महिलांची संघटन महत्त्वाचे आहे याकरिता महिलांनी एकत्र येऊन संवाद साधणे गरजेचे आहे असे विचार व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री) चव्हाण यांनी महिला सक्षमीकरण, सबलीकरण, बचतगटातील महिलांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग, महिला वर्गांने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आकाशाला गवसणी घातली असुन–
विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी महिलांनी खऱ्या अर्थाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून त्यांनी काव्यपंक्ती द्वारे महिलांना उदबोधन केले. कार्यक्रमात सारोळे खुर्द जि प शाळेच्या आदर्श शिक्षिका श्रीमती रोहिणी धारराव यांनी अतिशय सुंदर पद्धतीने शब्दरचना मांडून सोप्या, सरळ भाषेत ग्रामीण भागातील महिलांच्या हळदी कुंकू समारंभाचे सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थित महिला मान्यवरांची अष्टभुजा महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने औक्षण करून हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. याला समारंभासाठी ५३० महिलांनी सहभाग घेऊन हळदीकुंकू कार्यक्रमात सहभाग नोंदवला तसेच सर्व उपस्थित महिलांना सारोळे खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने चांगल्या पद्धतीची एक बॅग मिठाई व वाण वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सारोळे खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय पाटील डुकरे सर्व सदस्य मंडळ त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ ,तरुणाई आदींचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. शेवटी आभार अष्टभुजा महिला मंडळाचे अध्यक्ष सौ वनिता ईश्वर जाधव यांनी मानले.