आशाताई बच्छाव
850 मीटरचा रस्ता करायला लागतोय चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी ; सोनई – कांगोणी रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामाकडे होतेय सर्वांचीच डोळेझाक
, नेवासा,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)
सोनई – कांगोणी रस्त्याचं काम कसं धिम्या गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं होतंय, यांचं हा व्हिडिओ ढळढळीत पुरावा आहे. 850 मीटर लांबीच्या या रस्ता कामासाठी तब्बल 35 लाख रुपयांचा चुराडा केला जाणार आहे. मित्रांनो, हा सारा खर्च तुमच्या आमच्या कष्टाच्या कररुपी पैशांतूनच केला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याचं काम किती निकृष्ट दर्जाचं होतंय, यावर लक्ष द्यायला बाहेरच्या देशातले लोक यावेत आणि त्यांनी संबंधित ठेकेदाराला जाब विचारावा, अशी तुमची इच्छा आहे का? तशी तुमची इच्छा असेल तर तुमच्या इतका निष्क्रिय आणि बेजबाबदार नागरिक या जगात शोधूनही सापडणार नाही.
गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून या रस्त्याचं काम सुरु आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले होते. सय्यद यांच्या लाकडाच्या वखारीपर्यंत या रस्त्याची उंची वाढविण्यात आली. सुरुवातीला जेसीबीनं या रस्त्यावरची संपूर्ण खडी उखडून ती रस्त्याच्या दोन्हीही बाजूला पसरविण्यात आली. सर्वांना वाटलं आता लवकरच सोनई – कांगोणी हा रस्ता डांबरी होईल आणि यापुढे आपली ये – जा विना कटकटीची होईल. पण एवढं कुठं आपलं नशीब थोर? चार महिने झाले, या रस्त्याच्या कामात कसलीही प्रगती नाही.
या रस्त्याचं काम करत असलेल्या ठेकेदाराला या त्रासाला कंटाळून आम्ही आज संपर्क केला. त्यावर त्या ठेकेदारानं आम्हालाच उलट सवाल केला, ‘माझा मोबाईल नंबर तुम्हाला कोणी दिला’? अहो, ठेकेदार महाशय, तुमचा मोबाईल नंबर आम्हाला कोणी दिला, हा प्रश्न अजिबात महत्वाचा नाही. महत्त्वाचा प्रश्न हा आहे, चार महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊनही सोनई – रस्त्याचं काम अद्यापही प्रलंबित का आहे? ग्रामीण भागातील जनता तुम्हाला जाब विचारत नाही, याचा अर्थ तुम्ही मनमानी करायची का?
आठ दिवसांत काम पूर्ण होईल…!
गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त काळ रखडलेल्या सोनई – कांगोणी या 850 मीटर रस्त्याचं डांबरीकरण कधी होणार आणि त्या डांबरीकरणाचा दर्जा कसा राहणार? 35 लाख रुपयांचा खर्च अवघ्या 850 मीटर अंतराच्या या रस्त्यावर केला जाणार असल्यानं ते काम दर्जेदार व्हायलाच हवं, अशी अपेक्षा करणं ही सोनईच्या ग्रामस्थांची चूक आहे का? दरम्यान, या रस्त्याचं आठ दिवसांत काम पूर्ण होईल, असं आश्वासन या रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारानं आम्हाला दिलं आहे. मात्र या रस्त्याचं घाईगडबडीत थातूरमातूर काम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर लक्षात ठेवा, तुम्हाला सुट्टी नाही. नगर आणि नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुमची तक्रार करण्यात येईल. आता हा इशारा की धमकी समजायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचंय.