आशाताई बच्छाव
शेतकरी हितासाठी मार्च एंड पर्यंतचा कांदा निर्यात बंदीचा शासनाने पुनर्विचार करावा–
मा सभापती सौ सुवर्णाताई जगताप यांनी केली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कुटुंब कल्याण मंत्री व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
केंद्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता ३१ मार्च, २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी केल्याबाबत अधिसुचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे दि. ०८ डिसेंबर, २०२३ रोजी नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये केंद्र शासनाच्या सदर निर्णयामुळे कांदा बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी बांधवांनी अनेक ठिकाणी कांदा लिलावाचे कामकाज बंद पाडले असुन रस्ता रोको आंदोलन सुरू केलेले आहे.याबाबत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ भारती पवार
पत्र लिहून केंद्र शासनाने लागु केलेल्या कांदा निर्यात बंदीचा पुर्नःविचार होणेबाबत विनंती केलेली आहे.
शुक्रवार, दि. ०८/१२/२०२३ रोजी लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर ४२२ वाहनांमधुन लाल (खरीप) कांदा तर ६१ वाहनांमधुन उन्हाळ (रब्बी) कांदा विक्रीस आलेला असुन त्यापैकी लाल (खरीप) कांदा साठविण्यायोग्य नसल्याने शेतक-यांना सदर कांदा काढणीनंतर लगेच विक्री करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे दरवर्षी बाजार आवारांवर लाल (खरीप) कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. सद्यस्थितीत लासलगांव बाजार समितीत कांद्याची दररोज ०९ ते १० हजार क्विंटलची आवक होत असुन लवकरच बाजार आवारावर लेट खरीप (रांगडा) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होणार असल्याने डिसेंबर अखेर आवकेत अजुन वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी बांधवांमध्ये केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबाबत असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लासलगाव मुख्य बाजार आवारावर दैनंदीन कांदा लिलावाचे कामकाज सुरू होऊ दिले नाही. सदर निर्णयामुळे शेतकरी बांधवांना सध्या कांदा या शेतीमालास जो काही दर मिळत होता. त्यावर मोठ्या प्रमाणावर परीणाम होऊन शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
@ नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणावर कांद्यासह इतर शेतीमालाचे नुकसान झालेले असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यात केंद्र शासनाने दि. ०७ डिसेंबर, २०२३ रोजी घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी बांधव अजुन आर्थिक संकटात येईल.याबाबत विचार करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
मा सभापती सौ सुवर्णाताई जगताप लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती