आशाताई बच्छाव
गडचिरोलीत खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन, शेकाप नेते भाई जयंत पाटील यांची उलगुलान महासभेत टीका
गडचिरोली(सुरज गुंडमवार )-: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना पेसा, वनहक्क सारख्या कायद्यांच्या माध्यमातून ग्रामसभांना संरक्षण दिले आहे. यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्य शासनाला सुध्दा नाही. परंतु प्रशासन नियमांना डावलून खाणींना परवानगी देत असून येथे सुरू असलेले उत्खनन बेकायदेशीर आहे. असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. ते प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतर्फे शहरातील चंद्रपूर रोडवरील अभिनव लाॅन येथे आयोजित उलगुलान महासेभत बोलत होते.
आमदार भाई जयंत पाटील म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याचे खरे मालक येथील आदिवासी आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. परंतु येथे दडपशाही सुरू आहे. पेसा सारख्या कायद्यातून आदिवासींना ग्रामसभांचे विशेष अधिकार प्राप्त झाले आहे. आदिवासींच्या कित्येक पिढ्या येथील वनउपजावर आपली उपजीविका चालवतात. अशा स्थितीत ग्रामसभांचे अधिकार डावलून खासगी कंपन्यांना खनिज उत्खननाची परवानगी प्रशासन कसे काय देऊ शकते. वनकायद्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे काम ठप्प पडले आहे. खाणींना मात्र हा कायदा आडवा येत नाही. अशी खोचक टीका पाटील यांनी यावेळी केली.
मोर्चाची परवानगी नकारल्यावरून पाटील यांनी सरकारला खडे बोल सुनावले. ते म्हणाले इंग्रजांच्या काळात आंदोलनाची परवानगी दिल्या जात होती. परंतु आज संविधानाने अधिकार दिल्यानंतरही मोर्चा काढण्याची परवानगी दिल्या जात नाही, हे दुर्दैवी आहे. खाणींना विरोध केल्याने आदिवासींना नक्षलवादी म्हणून तुरुंगात डांबण्यात येतात. ही दडपशाही नव्हे तर काय आहे. यापुढे ही दडपशाही आम्ही लाल बावटा जिवंत असेपर्यंत खपवून घेणार नाही असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.
महासभेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. तुकाराम भस्मे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरिषदादा उईके, युवक प्रदेशाध्यक्ष राजेश इरपाते, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेश कोपूलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, आदिवासी नेते सैनु गोटा, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, भाकपचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, शेकाप महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, शिला गोटा, हंसराज उंदिरवाडे यांच्यासह ग्रामसभा प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..चौकट…..
अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा द्या
मागील कित्येक वर्षांपासून अंगणवाडी सेविका सन्मानजनक वेतनासाठी आंदोलने करीत आहेत. मात्र, शासन त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. खरे त्यांना शिक्षकांचा दर्जा द्यायला हवा. आम्ही वेळोवेळी त्यांचा आवाज विधिमंडळात पोहोचवला. यापुढेही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करू, असे आ. पाटील यांनी आश्वस्त केले.
……..