आशाताई बच्छाव
बंदी असताना प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड
तुमसर नगरपालिका प्रशासनाची धडक कारवाई; पंधरा हजार पाचशे रुपये वसूल
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )प्लास्टिकमुक्त शहर करण्याच्या तुमसर नगर पालिकेचा संकल्पाबाबत गेल्या महिन्याभरापासून जनजागृती केली जात आहे. आता गुरुवार पासून शहरात प्लास्टिक विकण्यास बंदी केल्यामुळे यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी तीन विक्रेत्यांना दंड करण्यात आला. गुरुवारपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.केंद्रशासनाने देशात प्लास्टिकबंदी केली आहे. राज्य शासनानेही यापूर्वीच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. नगर पालिकेच्या वतीने याची अंमलबजावणी सुरू आहे. केंद्रशासनाच्या आदेशानुसार आता ही कारवाईची मोहीम आणखीन तीव्र करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या मार्गदर्शनात आरोग्य निरीक्षक मोहन वासनिक यांनी गुरुवारी या मोहिमेअंतर्गत मुख्य बाजारातील आहुजा ट्रेडर्स यांच्या दुकानातील प्लास्टिक जप्त करून ५ हजार रुपये दंड वसूल केला तर अजय प्लास्टिक यांच्यावर प्लास्टिकविरोधी महिला पथकाने कारवाई करून प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल केला.व लाटकर पान दुकानावर पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला या सर्व संबंधित दुकानदारांना रीतसर पावती देण्यात आली.यावेळी विशेष पथकात प्रशासनिक अधिकारी बाजार विभाग प्रमुख देवानंद सावके, कर निरीक्षक प्रवीण बाबर,शालिनी मोगरे,रत्ना रगडे, अनिता रगडे, संजीव खोब्रागडे,चुन्नीलाल बडवाईक,नितेश भवसागर उपस्थित होते.नगरपालिका आरोग्य विभागाने प्लास्टिक विक्रीला आळा घालण्याकरिता विशेष महिला पथक स्थापन केला असून, रोज सकाळी, दुपारी, सायंकाळी या वेळेत कधीपण ही पथके अचानक दुकानाची तपासणी करणार आहेत. एकदा कारवाई झाल्यानंतर तोच विक्रेता पुन्हा सापडला, तर त्याच्यावर ५, १०, २५ हजार रुपये असा दंड केला जाणार असून *पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात येणार आहे* .या कारवाईचे रेकॉर्ड तयार केले जाणार आहे.प्लास्टिकचा वापर टाळा तसेच राज्यसरकारच्या निर्णयानुसार तुमसर शहरात याची अंमलबजावणी कडक केली जाणार आहे, त्यामुळे नागरिक, दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा. यापुढेही अशीच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे प्लास्टिक शक्यतो कापडी पिशव्यांचा तसेच पर्यायी साधनांचा वापर करावा, असे आवाहन नगरपालिका मुख्यधिकारी तथा प्रशासक सिद्धार्थ मेश्राम यांनी केले आहे.