आशाताई बच्छाव
देवळा,( भिला आहेर तालुका प्रतिनिधी) :- सटवाईवाडी ता देवळा येथील प्रताप (लालू) बापू जाधव (३६) या युवा शेतकऱ्याने शुक्रवारी( दि २३ )रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सततची नापिकी आणि यावर्षी पावसाने दिलेली ओढ यामुळे हताश होऊन घरालगतच्या असणाऱ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची देवळा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला .
याबत सविस्तर माहिती अशी की , प्रताप बापू जाधव (३६, रा. सटवाईवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्याकडे दीड एकर शेती असून त्याच्या पश्चात आई ,वडील, एक भाऊ पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. प्रताप यांचे आयुष्यच संघर्षमय राहिलं आहे. अल्प शेतीमध्ये कष्ट करून ते संसाराचा गाडा हाकत होते. पण, सातत्याने नापिकीचा सामना त्यांना करावा लागला. यावर्षी पावसाने दिलेली ओढ तसेच खर्च करून कांद्याचे उत्पादन घेतले. भाव मिळेल या आशेने कांदा चाळीत मध्ये साठवून ठेवला मात्र कांदाही पूर्णतः खराब झाला .बँक कर्ज देत नाही ह्या संकटात आणखीच भर घातली. त्यामुळे कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करावी आणि दैनंदिन खर्च कसा भागवावा, या विवंचनेत असलेल्या प्रताप यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा अशी घटनास्थळावरून प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी दि. २२ रोजी रात्रीला घरातील मंडळी झोपलेली असताना प्रताप यांनी घरालगतच्या विहिरीत उडी घेतली. शनिवारी दि २३ रोजी सकाळी प्रताप हे घरी नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता त्यांचे स्वेटर विहिरीजवळ आढळून आले. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी विहिरीकडे धाव घेऊन गर्दी केली. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सपोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येऊन प्रताप याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची सटवाई वाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .