आशाताई बच्छाव
चिपळूण परिसरात मुसळधार पाऊस रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापनासह नगर परिषद नियंत्रण कक्षदेखील सज्ज केले आहे. दरम्यान, धोकादायक बनलेल्या परशुराम घाटातील वाहतूक दिवसा सुरुच ठेवली आहे.
मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्टी व शिवनदी दुथडी भरून वाहत आहे. वाशिष्ठी नदीची समुद्र सापटीपासून ५ मीटर वर असलेली इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. बाजारपेठेतील बाजारपुल, नाईक कंपनी, भेंडीनाका, रंगोबा साबळे मार्ग, वडनाका, एकविरा देवी मंदिर, जुना कालभैरव मंदिर रस्ता या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. पहाटे पासून शहर आणि ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. धो-धो पाऊस पडल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. महामार्गावर डीबीजे महाविद्यालय, तसेच कापसाळ येथे पाणी तुंबले होते. याच पद्धतीने बाजारपेठेतील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर एक ते दीड फूट पाणी साचले आहे.