आशाताई बच्छाव
पालम तालुक्यातील 14 गावांचा संपर्क तुटला
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ परभणी (युवा मराठा न्युज नेटवर्क)
(परभणी)पालम:- तालुक्यात पावसाने कहर केला असून शुक्रवारी (ता. ८) रात्रभर पाऊस झाला. परिणामी, गळाटी, लेंडी, धोंडसह सर्वच नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने 14 गावांचा संपर्क पालम शहराशी तुटला आहे. अद्यापही पावसात खंड पडला नसून ही गावे संपर्कात येण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागेल.
पालम तालुक्यात आठवड्यापासून नियमित पाऊस होत आहे. त्यात शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसाने आणखीच भर घातली. तो पाऊस तालुक्यात सर्व दूर होता. शनिवारी (ता. ९) सकाळी ९ वाजेपर्यंत त्यात खंड पडला नाही. परिणामी, पालम तालुक्यातील गोदावरी वगळता उर्वरित सर्वच नद्याचे पाणी पात्रबाहेर आली आहे. प्रामुख्याने गोदावरीच्या उपनद्या असलेली गळाटी व लेंडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली. लेंडी नदीवरील पुयणी शेजारील पूल शनिवारी पहाटेपासून पाण्याखाली गेला. म्हणून त्यापलीकडील पुयणी, आडगाव, तेलजापूर, खडी, वनभुजवाडी, गणेशवाडी गावांचा संपर्क पालमशी तुटला.