राजेंद्र पाटील राऊत
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आपण पालक म्हणुन लक्ष द्या
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना विनंती
जिल्ह्यातील प्रलंबित जलसिंचन , रखडलेले रस्ते, महामार्ग, उद्योग निर्माण इत्यादी मुद्यांवर सुधीरभाऊंशी केली चर्चा
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील विकास कामांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून सातत्याने पाठपुरावा करूनही हे सरकार त्याकडे डोळेझाक करीत आहे, आपले गडचिरोली जिल्ह्यावर नेहमीच विशेष प्रेम राहिलेले असून आपल्या सक्षम नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी पालक म्हणून येथील प्रलंबित असलेल्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे माजी वित्तमंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना केली.
यावेळी आमदार महोदयांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबतचे निवेदन दिले. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे, हेमंत बोरकुटे, राजू खंगार प्रामुख्याने उपस्थित होते
मागील अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा जवळील राजीव उपसा सिंचन योजना, गडचिरोली तालुक्यातील वसा पोर्ला उपसा सिंचन योजना या योजनांना प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती केली. गोगाव उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीला पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करुन देण्याचीही विनंती केली
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आपण वित्त मंत्री असताना चामोर्शी तालुक्यातील बस स्टॉप करिता व तालुका क्रीडांगणासाठी निधी उपलब्ध करून दिला परंतु सत्तेतील महाविकास आघाडी सरकारने अजून पर्यंत मंजूर झालेला निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला नाही. यामुळे चामोर्शी येथील बस स्टॉप व तालुका क्रीडांगणाचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. धानोरा तालुक्यातील क्रीडांगणाचा प्रश्नही तसाच निधीअभावी अडकून पडलेला आहे. आपण जातीने याकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही विनंती त्यांनी यावेळी सुधीरभाऊंना केली
चामोर्शी -मूल मार्गाला जोडणाऱ्या राज्य मार्गाची व्यवस्था अतिशय खराब असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .अनेकांचा जीव या खराब रस्त्यामुळे गेलेला आहे त्यामुळे या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग करून महामार्ग करिता लागणारा निधी उपलब्ध करून दिल्यास या क्षेत्रातील लोकांना सोयीचे होईल. करिता आपण निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती यावेळी त्यांनी केली
एटापल्ली भागात सुरजागड लोह प्रकल्प सुरू असून या प्रकल्पातून अनेक लहान-मोठे उद्योग निर्माण होण्याच्या दृष्टीने तसेच अन्य लहान मोठ्या उद्योगांचे हित लक्षात घेऊन या ठिकाणी एमआयडीसी सुरू करण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.