राजेंद्र पाटील राऊत
होळीच्या निमित्ताने मिर्ची मजुरांचा परतीचा प्रवास धोक्याचा…
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली जिल्ह्यातील हजारोच्या संख्येत मजूर वर्ग रोजीरोटीसाठी तेलंगाना आणि इतर राज्यात मागील दोन तीन महिन्यापासून गेलेला आहे.एखादा सण आला की त्या लोकांना आपल्या घराची ओढ लागणे हे स्वाभाविक असते.पण यावेळी महाराष्ट्र राज्यात एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मुद्यावर असलेले आंदोलन हे प्रवासी लोकांना मोठा कष्टदायक ठरलेला दिसून येत आहे.
आपल्या गावाकडे परत येणाऱ्या मजुरांना वेळेवर एस टी बस मिळत नसल्यामुळे काही खाजगी वाहनात जसे, की मेटाडोर,ट्रक, मालवाहक डग्गा,किंवा ट्रॅक्स अशा प्रकारच्या वाहनात कोंबलेल्या अवस्थेत ,आपल्या जिवाला धोक्यात घालून हे मजूर प्रवास करताना दिसत आहे.
अशावेळी वाहनात मर्यादेच्या पलीकडे जाऊन जास्त संख्येत लोकं प्रवास करीत असल्याने कित्येत ठिकाणी वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडात्मक कारवाईचा बोजा सहन करावा लागतो आहे.
मजूर हे एकाच गावातील असल्याने ते संख्या प्रवासक्षमतेपेक्षा जास्त असली तरी एकाच वाहनातून प्रवास करतात.अशावेळी वाहतूक पोलीस वाहने थांबवून चालकाकडून पैशाची वसुली करत असतात. यामुळे मिर्ची तोड मजूर व त्यांची वाहतूक करणारे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
मजुरांच्या वाहन चालकाला झोपेची डुलकी लागल्याने अपघात झाल्याची घटना चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत.एस टी बस ची सोय नसल्याने या मजुरांना नाईलाजास्तव आपला जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे विदारक चित्र निर्माण झालेले आहे.शासनाने व त्या त्या क्षेत्रातील जिल्हा प्रशासनाने ही परिस्थिती गंभीरतेने घ्यावी ,आणि प्रवासी लोकांकरिता सुरक्षित प्रवास कसा करता येईल यासाठी, आवश्यक उपाय योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.