Home मुंबई मुंबईत २२ हजार कोटींचा SRA घोटाळा – ईडी’कडून ओमकार रियल्टर्सचे गुप्ता आणि...

मुंबईत २२ हजार कोटींचा SRA घोटाळा – ईडी’कडून ओमकार रियल्टर्सचे गुप्ता आणि वर्मा अटकेत

161
0

राजेंद्र पाटील राऊत

मुंबईत २२ हजार कोटींचा SRA घोटाळा – ईडी’कडून ओमकार रियल्टर्सचे गुप्ता आणि वर्मा अटकेत

प्रतिनिधी / राजेश भांगे

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ओमकार समूहाचे अध्यक्ष कमल नाथ गुप्ता आणि आणि व्यवस्थापकीय संचालक बाबू लाल वर्मा यांना सक्तवसुली संचनालयाने बुधवारी अटक केली आहे. चौकशीत सहकार्य न केल्याप्रकरणी ईडीने गुप्ता आणि वर्मा यांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी त्यांना PMLA कोर्टात हजार केले जाणार आहे. ‘ओमकार रियल्टर्स’ या कंपनीत जवळपास २२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

त्यापार्श्वभूमीवर ‘ईडी’ने सोमवारी ओमकार रियल्टर्सच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर ओमकार समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांची झडती घेतली होती. एकाचवेळी ओमकार समूहाशी संबंधित दहा ठिकाणी छापे पडल्यामुळे बांधकाम व्यवसायात खळबळ उडाली होती. या छाप्यात ‘ईडी’च्या हाती अनेक गोपनीय कागद लागले आहेत. त्यानुसार झालेल्या चौकशीनंतर आज कमल नाथ गुप्ता यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

ओमकार समूहाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी येस बँकेकडून ४५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. हे पैसे इतरत्र वळवल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवर खर्च केल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचाही आरोप ओमकार समूहावर ठेवण्यात आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावावर २२००० कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी ईडीने तपास सुरु केला असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

‘ईडी’च्या धडक कारवाईनंतर ओमकारने विकसित केलेल्या झोपडपट्टी पूर्नवसन प्रकल्पांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. महारेरा, सक्तवसुली संचालनालय, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.

मुंबई उच्च न्यायालयात ओमकार विरोधात याचिका दाखल

जोगेश्वरी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावावर ओमकार समूह आणि गोल्डन एज समूह यांनी मिळून सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. कर्ज घेण्याचे व्यवहार होऊन नऊ-दहा वर्षे उलटली तरी घरे बांधलेली नाही, असा आरोप करत एक याचिका मुंबईच्या उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन आणि सक्तवसुली संचालनालयाला त्यांची बाजू मांडण्याचा आदेश दिला. यानंतर सक्तवसुली संचालनालयाने ओमकार समुहाशी संबंधित दहा ठिकाणी छापे टाकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here