पालघर,(अनिकेत शिंदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
आरोपपत्रामध्ये या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. जुना आखाड्याचे कल्पवृक्षगिरी महाराज (70 वर्ष) त्यांचे सहाय्यक सुशीलगिरी महाराज (वय-35 वर्ष) आणि त्यांचा चालक निलेश तेलगडे (वय 30 वर्ष) यांची लहान मुलं चोरणारे समजून हत्या केली होती. या जमावाने तिघांवर लाठ्या काठ्यांनी आणि दगडांनी हल्ला केला होता. तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. ही हत्या पूर्वनियोजित कट रचून करण्यात आली नसून हा प्रकार अफवेमुळे घडल्याचं या आरोपपत्रामुळे स्पष्ट झालं आहे.
गडचिंचले गावामध्ये लहान मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली होती. कल्पवृक्षगिरी महाराज त्यांचे सहाय्यक सुशीलगिरी महाराज आणि त्यांचा चालक निलेश तेलगडे हे सूरत येथून एका अंत्यविधीला हजेरी लावून परतत होते. मुख्य रस्त्याने जाण्याऐवजी आतला रस्ता घेऊ ज्यामुळे पोलिसांची नाकेबंदी फार असणार नाही असं म्हणून त्यांनी या गावातून गाडी नेण्याचं ठरवलं होतं. गावात अफवा पसरल्याने आणि साधूंची गाडी फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्याने जात असल्याने जमावाने साधूंना आणि त्यांच्या चालकाला घेरले आणि त्यांचा जीव जाईपर्यंत मारहाण केली.