आशाताई बच्छाव
एैतिहासिक झेंडा परिषदेत एकजुटीने होणार ‘जय लहुजी’ चा गजर
परभणी येथे पहिली राज्यस्तरीय परिषद
मातंग समाजाच्या समस्यांवर विचारमंथन
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- मातंग समाजाच्या विकासासाठी झटणार्या राज्यभरातील विविध मातंग संघटनांची एकजुटीची मोट बांधुन समाजाच्या विविध समस्यांवर विचारमंथन व निराकरणासाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या पुढाकारातून येत्या गुरुवार, ११ एप्रिलला परभणी येथे मातंग समाजाची पहिल्या राज्यस्तरीय एैतिहासिक झेंडा परिषदेची पायाभरणी होत आहे. या परिषदेला राज्यातील सर्व मातंग समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य संयोजक तथा लहुजी साळवे बहूजन क्रांती सेनेचे अध्यक्ष राधाजी शेळके तथा जिल्हाध्यक्ष वासुदेव गायकवाड यांनी केले आहे.
मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीला सुरुवात होऊन ४२ वर्षे पुर्ण होत आहेत. या ४२ वर्षामध्ये समाजाने अनेक चढउतार पाहिलेले आहेत तसेच अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढून आपले वेगळे सामाजिक अस्तित्व निर्माण केले आहे. समाजामध्ये आद्यक्रांतीवीर लहुजी साळवे, साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे, स्वराज्यासाठी लढलेले येल्ल्या मांग, सर्ज्या मांग, क्रांतीवीर फकीरा, शहीद पोचीराम कांबळे, शहीद चंद्रकांत कांबळे, असे अनेक आदर्श व्यक्तीमत्व होऊन गेले. यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाज योग्य दिशेने मार्गक्रमण करीत आहे. देशातील व राज्यातील समाजामध्ये ’जय लहुजी’ या घोषवाक्यामुळे एकसुत्रता दिसत आहे. ती दिसत असली तरी व काही भागात एक झेंडा असला तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळे झेंडे मात्र समाजाला एक ओळख देण्यात असमर्थ ठरत असल्याचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे समाजात ’कोणता हा झेंडा घेऊ हाती असा प्रश्न ४२ वर्षापासून सतावत आहे आपला झेंडा एक नाही, आपले नेते एकत्रित येत नाहीत अशी समाजामध्ये नकारात्मक भावना दिसत आहे. समाजाची भावना आहे की, समाजाच एक झेंडा व्हावा आणि याच भावनेचा आदर करुन समाजाच्या सर्व छोट्या-मोठ्या संघटना व या संघटनाप्रमुखांनी मोठ्या मनाने एकजुटीने एका जागी येऊन मातंग समाजाच्या विकासासाठी झटावे. हा विचार घेऊन परभणी येथे आयोजीत मातंग समाजाची पहिली राज्यस्तरीय ऐतिहासिक झेंड परिषदेला देशातील व राज्यातील सर्व संघटना प्रमुखांनी त्यांच्या पदाधिकार्यांनी तसेच विविध क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांनी सहभागी होवून या ऐतिहासिक परिषदेचे साक्षीदार व्हावे असे आवाहन वासुदेव गायकवाड यांनी केले आहे.