आशाताई बच्छाव
मेनोपाॅज- निसर्ग चक्राचा भाग
या पृथ्वीतलावरील प्रत्येक स्त्रिला मेनोपाॅजमधून जावे लागते.हा टप्पा वयाच्या साधारण ४०ते ५० या कालावधीत येतो.स्त्रियांना चाळीशीच्या दरम्यान मेनोपाॅजची लक्षणे दिसू लागतात.मेनोपाॅज म्हणजे रजोनिवृत्ती.म्हणजे स्त्रिची पाळी पूर्णपणे थांबते.साधारणपणे स्त्रियांना वयाच्या ५० व्या वर्षी मेनोपाॅज येतो. काही स्त्रियांना या आधीही मेनोपाॅजमधून जावे लागते.याचाच अर्थ स्त्रिची प्रजननक्षमता पूर्णपणे थांबते.हा तिच्या प्रजननाचा शेवटचा टप्पा असतो.कित्येकदा स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते.कित्येकदा महिन्यातून दोन वेळा मासिकपाळी येते.यातच स्त्रिला मानसिक आणि शारीरिक त्रासातूनही जावे लागते.छातीत धडधड होणे, अचानक घाम फुटणे, चिडचिड होणे,मूड स्विंग असे कितीतरी लक्षणे या काळात होतात. मेनोपाॅज ही एक नैसर्गिक बाब आहे.जेव्हा स्त्रिला साधारण १ वर्षापर्यंत मासिक पाळी येत नाही तेव्हा त्या स्त्रीला मेनोपाॅज झालेला असतो.काही स्त्रियांचा मेनोपाॅज लवकर होतो तर काही स्त्रियांचा उशिरा.स्त्रियांमध्ये या काळात हार्मोन्सची कमी व्हायला लागते.इस्ट्रोजन या हार्मोन्समुळेच स्त्रियांची पाळी नियमित येते.वाढत्या वयासोबत इस्ट्रोजनची पातळी कमी कमी होत जाते आणि मेनोपाॅज येण्याची लक्षणे दिसू लागतात.अशावेळी स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल घडत असतात.इस्ट्रोजनच्या कमी होण्याने केस गळणे, चिडचिड होणे,मूड खराब होणे,हाॅट फ्लॅशेस यासारखी लक्षणे दिसू लागतात.ही लक्षणे प्रत्येक स्त्री नुसार वेगवेगळी असतात.काहींना वरील लक्षणे जाणवतात तर काही स्त्रियांना ही लक्षणे जाणवतही नाहीत.या काळात त्वचा कोरडी पडते,मन एकाग्र होत नाही, स्मरणशक्ती कमी होते.हाॅट फ्लॅशेसमध्ये मेंदूला वाटतं की शरीराचं तापमान वाढायला लागलंय.वास्तविक पाहता तसं नसतं.मन बेचैन होणे, चिंताग्रस्त होणे यासारखी लक्षणेही मेनोपाॅज दरम्यान स्त्रियांना अनुभवायला येतात.
मेनोपाॅजच्या काळात स्त्रियांच्या शरीरातील प्रोजेस्टेराॅन आणि टेस्टोस्टेराॅन या हार्मोन्सची पातळी कमी होते.प्रोजेस्टेराॅन दर महिन्याला स्त्रिला गर्भधारणेसाठी तयार करतं.पण मेनोपाॅज झाला की याची स्त्रिच्या शरीरातील पातळी कमी होते.टेस्टोस्टेराॅनची स्त्रिच्या शरीरातील पातळी कमी होते तेव्हा स्त्रीची शारीरिक एनर्जी कमी होते.ही लक्षणे कमी करण्यासाठी नियमित व्यायाम,योगा, प्राणायाम, व्हिटॅमिन डी चे सेवन करून शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करणे महत्त्वाचे आहे.शरीरातील स्त्री बीजग्रंथी वाढत्या वयात काम करणे बंद करतात.यामुळेच हार्मोन्सचे संतुलन बिघडते.जी महिला नोकरी करून घर सांभाळते तिला तर अधिकच ताणतणावातून जावे लागते.हा संपूर्ण काळ स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा काळ असतो.या काळात झोप व्यवस्थित न लागणे ही देखील एक मोठी समस्या आहे.हाडे ठिसूळ होणे, कसलीतरी भीती वाटणे, विसराळूपणा देखील वाढलेला असतो.म्हणजेच स्त्रियांना मेनोपाॅजच्या काळात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागते.या काळात स्त्रियांची चयापचय क्रिया मंदावल्याने त्यांच्या वजनात वाढ होते. मेनोपाॅज कधी येणार हे तिच्या आईला कधी मेनोपाॅज झाला यावर तसेच महिलेच्या आयुष्य जगण्याच्या पध्दतीवरही अवलंबून असते. मेनोपाॅजचा त्रास कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. मसालेदार,कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे शक्यतोवर टाळावे. मेनोपाॅज कुठलाही आजार नाही तर शरीरात होणारा बदल आहे.मासिकपाळी सुरू होताना जशी प्रत्येक मुलीच्या मनाची घालमेल होते तशीच घालमेल मासिकपाळी बंद होताना स्त्रिया अनुभवतात.हा एक नैसर्गिक भाग आहे.या पर्वाला स्त्रियांनी सकारात्मक दृष्टीने स्विकारणे महत्वाचे आहे.
लैलेशा भुरे
नागपूर