आशाताई बच्छाव
आजचा विद्यार्थी भरकटतोय
विद्यार्थी जीवन हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे.या काळाला सुवर्णकाळ मानले गेले आहे.या काळात विद्यार्थी आपल्या भविष्याकरीता लक्ष ठरवून ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात.म्हणजेच या काळाला भविष्यातील यशाचा आधारस्तंभ म्हणता येईल.परंतु आज ब-याच विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान आणि अभ्यासाविषयी उत्सुकता दिसत नाही.काही विद्यार्थी पुस्तकांना आपले शत्रू मानतात आणि त्यापासून दूर पळतात.त्यांचा अभ्यासाकडे असलेला कल हळूहळू कमी होतो आहे.जेव्हा विद्यार्थी त्याच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा अतिरिक्त अभ्यासक्रमाच्या अभ्यासाची त्याच्याकडून अपेक्षाच करता येत नाही.नुसती घोकंपट्टी करणे म्हणजे अभ्यास नव्हे. अभ्यासक्रमातील विषय नीट समजून घेऊन मग त्याचे चिंतन,मनन करणे म्हणजे खरा अभ्यास.
हल्ली काही विद्यार्थ्यांमध्ये शीस्त, नम्रता दिसून येत नाही.कधीकधी तर काही विद्यार्थ्यांची मजल शिक्षकाला मारहाण करण्यापर्यंत जाते.हे नक्कीच सकारात्मक चित्र नाही.काही विद्यार्थी उत्तेजक पदार्थांच्या आहारी जातात आणि आपलं आयुष्य बर्बाद करतात.काय योग्य काय अयोग्य याची त्यांना जाणीव नसते.स्वत:चा वेळ मौजमजा करण्यात घालवणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय असते.वक्तशीरपणाशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो.काही बंड प्रवृत्तीचे विद्यार्थी वर्गातील चांगल्या अभ्यासू विद्यार्थ्यांना नाहक त्रास देतात.आज अभ्यासू विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.जीवनाकडे फक्त टाईमपास म्हणून पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो.काही विद्यार्थ्यांना फक्त गुणपत्रिकेत चांगले गुण हवे असतात.त्यासाठी ते अभ्यास न करता नक्कल करून गुण मिळवतात.अशा ज्ञानाचा काय उपयोग? अश्याने त्याची बौद्धिक पातळी नक्कीच वाढणार नाही.पण याचे कित्येक विद्यार्थ्यांना काहीच वाटत नाही.म्हणजे आजचा विद्यार्थी परीक्षार्थी झाला आहे.त्याला ज्ञानार्थी व्हावे असे वाटत नाही.याला जवाबदार हल्लीची शिक्षण प्रणालीही आहे असं मी म्हणेल.हल्ली वर्गात शिक्षकांकडून प्रश्नांची उत्तरे खुणा करून दिली जातात आणि त्याचीच घोकंपट्टी मुलांना करायला सांगितले जाते.जर विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम न वाचताच प्रश्नांची उत्तरे पाठ करू लागला तर त्याचे ज्ञानवर्धन नक्कीच होणार नाही.कधीकधी पाठ्यपुस्तकातील उत्तरे चुकीची असतात.मग तिच चुकीची उत्तरे परीक्षेत लिहिली जातात.पाठ्यपुस्तके जोपर्यंत विद्यार्थी वाचणार नाहीत तोपर्यंत कसं त्यांचं ज्ञान वाढणार?फक्त जास्तीत जास्त गुण कसे मिळतील यापेक्षा मुलभूत ज्ञान कसे मिळेल याकडे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही लक्ष देणे गरजेचे आहे.खूप गुण मिळाले म्हणजेच आपण विद्वान झालो असे नसते.आजचे शिक्षण पुस्तकी झाले आहे.हल्ली आपण सर्व प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचत असतो. शिक्षण घेऊन जेव्हा आयुष्यातील प्रत्यक्ष परिस्थितीशी सामना करावा लागला की विद्यार्थी ज्ञानाकडे गंभीरपणे बघतील.साहाजिकच ज्ञानाचा दर्जा उंचावेल आणि विद्यार्थी ज्ञानार्थी होतील.
जो विद्या आत्मसात करतो, ज्ञानार्जन करतो व त्यातून आपला सर्वांगीण विकास करतो तोच खरा विद्यार्थी.पण खेदाची बाब म्हणजे आजच्या परिस्थितीत फक्त चांगले गुण मिळवणे हीच संकल्पना विद्यार्थ्यांची असते.तेव्हा पालक आणि शिक्षक यांच्या हातात चांगले विद्यार्थी घडवणे आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
लैलेशा भुरे
नागपूर