Home सामाजिक कुटुंबव्यवस्था

कुटुंबव्यवस्था

244

आशाताई बच्छाव

IMG_20240201_170712.jpg

कुटुंबव्यवस्था

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती.घरातील सर्व मंडळी गुण्यागोविंदाने नांदत असत.एकत्र कुटुंब असल्यामुळे घरातील खर्चही आटोक्यात राहत असे.पण सध्या नोकरीसाठी तरूण वर्ग बाहेरगावी किंवा परदेशात जाऊ लागला आहे.हल्लीच्या जास्तीत जास्त मुलींना एकत्र कुटुंबपद्धती आवडत नाही हे वास्तव आहे.मुलगी नोकरी करणारी असेल किंवा नसेलही, तिला लग्नानंतर सासू-सासरे, नणंद, दीर नको असतात.तिला मुक्तपणे जगायचं असतं.हल्लीच्या मुलींची विचारसरणी घरातील लोकांना रूचेलच असेही नाही.घरातील वृध्दांशी होणारे मतभेद तिला नको असतात.घरात त्यामुळे वादावादी निर्माण होते.तिला तिच्या पध्दतीने आयुष्य जगायचं असतं.हे सगळं होण्यापेक्षा चांगल्या मनाने वेगळं राहण्याचा निर्णय घेणं कधीही चांगलं.प्रत्येकच मुलगी स्वतःला एकत्र कुटुंबात सामावून घेऊ शकत नाही.हल्ली तर मॅट्रिमोनी साइटवर मुले,मुली एकमेकांना पसंत करतात.काही मुली अगदी स्पष्टपणे सांगतात की आम्हाला एकत्र कुटुंब नको.आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जगायचे आहे.
संयुक्त कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच.भांडणतंटा करण्यापेक्षा गोडीगुलाबीने विभक्त होऊन राहणे केव्हाही चांगले.मुख्य म्हणजे सर्वांची एकमेकांविषयी आपुलकी असणे गरजेचे आहे.मग ती एकत्र राहून असो वा विभक्त होऊन.पूर्वी घरात अनेकजण असायचे.त्यामुळे प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडत असे.नातवंडे आजी- आजोबांच्या सानिध्यात राहत असल्यामुळे त्यांच्यावर आपसूकच चांगले संस्कार व्हायचे.एकत्र कुटुंबात भावनिक आणि मानसिक आधार मिळत असे.आजी- आजोबा पण आपल्या नातवंडांसोबत वेळ घालवून खुश राहायचे.एकत्र कुटुंब आजही आहेत.परंतु नुसतं एकत्र राहण्याला संयुक्त कुटुंब आपण म्हणू शकत नाही.सर्वांनी एकमेकांशी संवाद साधून मानसिकदृष्ट्या एकत्र असणं महत्त्वाचं आहे.मुलगा-सूनेनेही घरातील वृध्दांची काळजी घ्यायला हवी.तेव्हाच त्याला संयुक्त कुटुंब म्हणणे योग्य ठरेल.काही वृध्दांना पेंशन नसते.अशावेळी ते पूर्णपणे आपल्या मुलांवर अवलंबून असतात.काही घरांत यावरून सून किंवा मुलगा आपल्या घरातील वृध्दांना घालून पाडून बोलतात.त्यांची कुणीही घरात काळजी घेत नाही जे चुकीचं आहे.अशा एकत्र कुटुंबाचा काय उपयोग? घरातील वृध्दांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची जाणीव घरातील प्रत्येकानेच ठेवायला हवी.
पूर्वी स्त्री चूल आणि मूल यातच अडकली असायची.तिला एकत्र कुटुंबात मुलांचा सांभाळ फारसा करावा लागत नसे.आजी-आजोबा किंवा घरातील इतर मंडळी मुलांचा सांभाळ करीत असत.कुठलाही निर्णय घरातील वडीलधारी लोकांशी संवाद साधून घेतल्या जायचा.पूर्वी स्त्रिया कुटुंबात तडजोड करून,सर्वांची मर्जी सांभाळून संसार करायच्या.हल्ली हे चित्र पालटल्याचे दिसून येतं.बहुतांश मुली एक तर संयुक्त कुटुंबात राहायला तयार नसतात किंवा त्यांना कुटुंबासोबत जमवून घेणे जमत नाही.तिला फक्त चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंब हवं असतं.प्रत्येकाची वैचारिक पातळी भिन्न असते.प्रत्येक व्यक्तीचे मतही वेगवेगळे असते.कुटुंब एकत्र असो वा विभक्त,नफा-नुकसान दोघांतही आहेत.काळानुसार कुटुंबपद्धतीत बदल होणारच.त्याचा आपण मोठ्या मनाने स्वीकार करायला हवा.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleजनता विद्यालयाचा शासकीय रेखाकला इंटरमिजेट ग्रेड परीक्षेचा निकाल १००%
Next articleपोलिसांच्या घरी चोरी करणे पडले माहागात ५लाख३० हजाराचा येवत जप्त ५ आरोपींना अटक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.