आशाताई बच्छाव
सौभाग्य “आजपासून नागपूर येथील प्रसिद्ध लेखिका लैलेशा भुरे यांचे सामाजिक विषयावरील लेख आम्ही प्रसिद्ध करीत असून त्यांच्या या विविध विषयांवरील लेखाबद्दल आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित आहेत.आपल्या प्रतिक्रियांना आपल्या नावानिशी प्रसिद्धी दिली जाईल.” व्यवस्थापकीय संपादक
आपला भारत देश परंपरांनी जोडल्या गेलेला आहे.हिंदू संस्कृतीत बायका ,मुली आपल्या कपाळावर टिकली किंवा कुंकू लावतात.एक हिंदू धर्म सोडला तर स्त्रियांनी कपाळावर काहीही लावण्याची प्रथा अन्य कुठल्याही धर्मात नाही.हिंदू समाजात सौभाग्याची सांगड कुंकवाशी घालण्यात आली आहे.प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आली आहे.कपाळावर कुंकू धारण करणारा हिंदू हा एकमेव समाज आहे.हिंदू संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम हिंदू स्त्रिया यशस्वीपणे पार पाडत आल्या आहेत.कुठल्याही जातीच्या, पंथाच्या स्त्रियांच्या कपाळावर असलेल्या कुंकू/टिकलीने हिंदुत्वाला मानणा-या लोकांशी अगदी घट्टपणे चिकटून ठेवले आहे.
कुठलीही जात,प्रांत असो… हिन्दू स्त्रियांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे त्यांनी कपाळावर लावलेल्या कुंकवाचा किंवा टिकलीचा.सौभाग्यवती स्त्रियांची ती खुण आहे.आपल्या देशात वेगवेगळ्या प्रांतात राहणा-या स्त्रियांचे सौभाग्य अलंकार वेगवेगळे असले तरी त्यांच्यात टिकली/कुंकू हा दुवा समान आहे.हा एवढासा बिंदू समोरच्याला हिंदुत्वाची जाणीव करून देतो.आपल्या पूर्वजांनी सौभाग्याच्या या निशाणीची सांगड हिंदू संस्कृतीशी घालून पर्यायाने धर्म कसा जिवंत राहील याची सोय करून ठेवली आहे.कुंकवाचा संबंध सौभाग्याशी असल्याने स्त्रिया या सौभाग्याच्या लेण्याला अगदी जिवापाड जपतात.आपल्याकडे तर एकमेकांकडे गेलो की बायका एकमेकींना हळदी कुंकू लावतात.म्हणजेच त्या हिंदू धर्माची जपणूक करतात.हिंदू धर्मात सर्व वयातील मुली, बायका, विधवा स्त्रिया कपाळावर टिकली किंवा कुंकू लावतातच,फरक फक्त त्यांच्या रंगात असतो.आता तर विधवा स्त्रिया कपाळावर काळी टिकली न लावता लाल टिकली लावतात. हे परिवर्तन सुखावहच आहे.कुंकू/टिकलीची जागा कपाळावर जराही इकडे तिकडे झाली की त्या स्त्रिच्या दिसण्यात बराच फरक पडतो.बघा ना… एवढ्याश्या टिकलीने चेह-यात किती फरक पडतो.टिकली म्हणजे सौंदर्य आणि धर्म रक्षणाचं साधन आहे असे आपण समजतो.आताश्या टिकली नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.काहींना टिकली लावणे गरजेचे वाटत नाही.काहींना त्यात गैरसोय वाटते.काहींना हे मागासलेपण वाटते. कुणालाही यासाठी जबरदस्ती करणे योग्य नाही.कारण कुणी कसं राहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.हा अधिकार फक्त त्या व्यक्तीला असतो.आपल्या समाजात सवाष्ण बाईला प्रत्येक मंगल कार्यात स्थान दिलं जातं.तिचं शुभकार्यात असणं शुभ समजलं जातं.आपल्याकडे नवीन लग्न करून आलेल्या मुलींना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला जातो.म्हणजे पतीमुळे स्त्रिला सौभाग्याचा मान मिळतो.प्रत्येक शुभ कार्यात सवाष्ण स्त्रियांना विशेष मान दिला जातो.ओटी भरणे, औक्षण करणे,वाण देणे इत्यादी गोष्टी त्या करत असतात.मग अशावेळी विधवा बायकांना डावलले जाते. काय वाटत असेल त्यांना याचा विचार कुणीच करत नाही.पती जिवंत असताना तिला मिळणारा मान तिला पती निधनानंतर मिळत नाही.सौभाग्य शब्दाची व्याख्या आजच्या काळात परत एकदा तपासून बघण्याची वेळ आली आहे.सौभाग्य म्हणजे चांगले भाग्य.पती जिवंत असल्यामुळे स्त्रिला चांगले भाग्य लाभते अशी आपण जरी व्याख्या केली तरी हे कितपत बरोबर आहे? ज्या बायकांचे पती दारू पिऊन त्यांना रोज मारहाण करतात अश्या बायकांना त्या सौभाग्यवती आहेत असे आपण म्हणू शकतो का? नक्कीच नाही.काय उपयोग अश्या नव-याचा? तरीही त्या बायका कपाळावर टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र मोठ्या दिमाखात मिरवत असतात.नवरा मरण पावल्यानंतर तिच्यातलं पावित्र्य,देवत्व निघून जातं का?हे मला पटत नाही.
स्त्रियांनी सौभाग्याचा मान म्हणून सौभाग्य अलंकार किंवा टिकली/कुंकू जरूर लावावे.त्याला काहीच हरकत नाही.पण त्यासाठी कुणावर जबरदस्ती करू नये.आधी टिकली, मंगळसूत्र घालणा-या स्त्रिया विधवा झाल्यावर अचानक भोंडे कपाळ घेऊन फिरतात किंवा काळी टिकली लावतात.म्हणजे बायकांना तुझा नवरा नाही आता याची वारंवार जाणीव करून दिली जाते.ही पध्दत बदलायला हवी.
लैलेशा भुरे
नागपूर