आशाताई बच्छाव
शाळा प्रवेशावेळीच विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण आणि संगोपन
सौ. सीमाताई खोतकर यांनी मांडली संकल्पना; रेणुकामाता नगर येथे वृक्षारोपण संपन्न
जालना । दिलीप बोंडे ब्युरो चीफ – विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशावेळी त्याच्या हाताने एक वृक्ष लावून घ्यावे व जो पर्यंत विद्यार्थी शाळेत आहे तो पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन हे त्या विद्यार्थ्याने करावे अशी संकल्पना सौ. सीमाताई अर्जुनराव खोतकर यांनी येथे मांडली. तसेच ही संकल्पना अर्जुनराव खोतकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवून राज्यभरात असा उपक्रम राबवता यावा यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रेणुका माता नगर येथे नगरवासियांकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम मंगळवार (दि 13) रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सौ. खोतकर बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवगिरी प्रांत ग्रामविकास संयोजक विलासअन्ना दहिभाते, मदनराव दहिभाते, सौ. मेघा झंवर यांची उपस्थिती होती.
पुढे सौ. खोतकर म्हणाल्या की, वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास रेणुका माता नगर वासियांचा उल्हास आनंदीत करणारा आहे. तसेच महिलांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रत्येक कॉलनीत अशा पद्धतीने वृक्षारोपणाचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. वृक्षारोपणासाठी मदत करण्यास मी सदैव तत्पर राहील. वृक्षारोपणामुळे वातावरण प्रफ्फुलीत राहुन प्रदुषण कमी होईल, ऑक्सीजनच्या प्रमाणात वाढ होईल. वृक्षारोपणासंदर्भात अर्जुनराव खोतकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत एक संकल्पना मांडणार असल्याचा उल्लेख करत त्यांनी शालेय प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवड करावी व त्या वृक्षाचे संगोपन हे विद्यार्थी शाळेत असेपर्यंत त्यांनेच करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.