आशाताई बच्छाव
गोंदेगाव च्या हिरकणीने अथक परिश्रमाने केले पोलीस दलात भरतीचे स्वप्न पूर्ण—
दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती! हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेली या काव्यपंक्तीची ज्योत घेऊन धावणाऱ्यांच्या जीवनात अंधकार येण्याची शक्यता कमी आहे. अश्रूंची फुले करण्याची ताकद या कवितेत सामावलेली आहे. ताकद, स्फूर्ती, आणि प्रेरणा काठोकाठ भरलेली ही कविता निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील एका हिरकणीने प्रेरक मानली अन त्या जोरावर मुंबई पोलीस दलात पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण केलं. चार महिन्यांच्या तान्ह्या मुलीला सासूच्या पदरी देऊन भरती होण्यासाठी जाणाऱ्या दीपाली पगार- गाडे या आधुनिक हिरकणीचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. काल जाहीर झालेल्या मुंबई पोलीस अंतिम यादीत दिपालीची निवड झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील बाबासाहेब पगार यांची कन्या असलेल्या दिपाली यांचा विवाह गोंदेगाव (ता.निफाड) येथील रावसाहेब गाडे यांचा मुलगा अमोल यांचेशी २०२० मध्ये विवाह झाला. विवाहापूर्वी विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत असतांनाच दिपालीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणास सुरुवात केली होती. विवाह झाल्यास वर्दीच्या स्वप्नांचा चुराडा होणार नसेल तरच लग्न करेन या अटीवर दिपालीने विवाह केला. पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्याची ईच्छा दिपालीने अमोल यांना बोलून दाखविली. सुशिक्षित कुटुंब असलेल्या गाडे परिवाराने दिपालीच्या स्वप्नांच्या आड न येण्याचे ठरवले. त्यात दोघांच्या संसारात अन्वी या गोंडस मुलीचा जन्म झाला. एकीकडे बाळाचा लळा आणि दुसरीकडे खुणावणारी पोलीस वर्दी यांच्या द्वंद्वात असलेल्या दिपालीच्या पंखात अमोलने बळ भरले. खरा प्रश्न होता त्या चिमुकलीचा. अवघ्या चार महिन्यांच्या मुलीला सोडून दूर जायचे दिपालीचे मन होईना. तो प्रश्न सासू लता गाडे यांनी सोडविला. मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी सासू लता यांनी स्वीकारली अन दिपालीच्या स्वप्नंचा रस्ता मोकळा झाला. भरती पूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी दिपालीने थेट पुणे गाठले.
अंतःकरणात पाझर फोडणारी हिरकणी आणि दुसरीकडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारी तरुणी अशा दोन्ही आघाड्यांवर दिपाली झुंजत होती. शेतीवर अवलंबून असलेल्या गाडे कुटुंबाने तडजोड करत तर कधी मोलमजुरी करत दिपालीचा खर्च भागविला. या कष्टांची जाणीव ठेवून दीपालीने देखील मैदानी कसरत आणि लेखी परीक्षेचा जोरदार सराव केला. मुंबई पोलीस भरतीमध्ये जीवाचे रान करत तिने झोकून दिले. जिद्द, चिकाटी, सरावात सातत्य असेल तर यश देखील चरणी लोटांगण घेते, याची प्रचिती दिपालीला आली. दि.१७ लागलेल्या निकालात मुंबई पोलीस दलात निवड झाल्याचे कळता मात्र तिचे आनंदाश्रू थांबता थांबेना. वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तान्हुल्यापासून दूर गेलेल्या तिच्या अंतःकरणातील मातेस रडू आवरत नसल्याचे चित्र बघायला मिळाले. दिपाली पगार – गाडे हिने मिळविलेल्या यशामुळे नाशिक जिल्ह्यात दिपालीचे कौतुक होत आहे.