आशाताई बच्छाव
घर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलडाणा, : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे पाच लाख घरांवर झेंडा उभारण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सर्वांना झेंडे उपलब्ध व्हावेत, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र आणि राज्यस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती आज जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अधीक्षक शामला खोत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, नागरिकांमध्ये स्वातंत्र्याचा उत्साह निर्माण करून त्यांच्यात देशभावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आलेले स्वातंत्र्यसैनिक, माजी-आजी सैनिक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण हाती घेण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांबाबतची माहिती प्रदर्शनातून देण्यात येणार आहे. यासोबतच दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्व नागरिक ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणतील. या उपक्रमात ग्रामसभेची विशेष सभा, वारसास्थळांच्या पदयात्रा, लोकोत्सव, संविधान स्तंभ उभारणे, आजी-माजी सैनिकांच्या समस्यांसाठी विशेष शिबीर, अमृत सरोवर घेण्यात येतील.
हर घर तिरंगा उपक्रम राबविताना नागरिकांना ध्वजसंहितेचे पालन करावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची माहिती व्हावी, यासाठी ध्वज विक्रीच्या ठिकाणी माहिती देण्यात येणार आहे नागरिकांना ध्वज उपलब्ध व्हावेत, यासाठी खादी ग्रामोद्योग आणि बचत गटांशी संपर्क साधून त्यांना ध्वज निर्मितीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वज उपलब्ध व्हावेत, यासाठी स्वस्त धान्य दुकानातूनही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे, नागरिकांनी यात सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.