आशाताई बच्छाव
सलगरा फाटा ते सलगरा पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था, तर कर्णा पाटी ते वतापर्यंतचा रस्ता बनला जीवघेणा
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा जाणाऱ्या
सलगरा पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, तर याच मार्गावरील कर्णा पाटी ते सलगरा हद्दीतील वतापर्यंतच्या रस्त्याचे बारा वाजले असल्याचे विदारक चित्र सद्यस्थितीत पहावयास मिळत आहे.या रस्त्यावर दुचाकी, तिन चाकी,चार चाकी वाहनांची मोठी वर्दळ असते परंतु सद्यस्थितीत या रस्त्याची अतिशय दुरवस्था व चाळण झालेली असून तालुक्यातील आजी – माजी लोकप्रतिनिधी व राजकीय पुढाऱ्यांना या रस्त्याची दुर्दशा का दिसून येत नाही ? निवडणूका आल्या की, राजकीय नेते मंडळी मतदारांच्या दारोदारी फिरत भागातील विकासाच्या मोठ्या गप्पा गोष्टी करतात, खोटी आश्वासने देतात आणि निवडणूकीमध्ये निवडून येतात.परंतु हेच राजकीय नेते निवडूण आल्यानंतर मतदारसंघातील विकासाकडे दुर्लक्ष करीत असतात त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या भागातील जनता अशा लबाड लोकप्रतिनिधींना जाब विचारणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे
ठरणार असे गावातील सुज्ञ नागरीकांतून बोलल्या जातयं. वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचे या रस्त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष झाले आहे.मागील सहा सात महिन्यांपूर्वी बेटमोगरा येथील नवतरुण सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भिड पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून वेळोवेळी संबंधीत प्रशासनाकडे अर्ज, निवेदने देऊन संबधित प्रशासनाला धारेवर धरत या सलगरा फाटा ते बेटमोगरा हा रस्त्याचे काम चालू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी पाठपुरावा केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले. मात्र या
सलगरा फाटा ते बेटमोगरा पर्यंत जवळपास रस्त्याचे काम पुर्ण झाले.मात्र उर्वरीत सलगरा फाटा ते सलगरा पुलापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून आता तर ऐन पाऊसाळा सुरू असल्याने त्या खड्यामध्ये पाणीच पाणी साचले असून आजूबाजुला चिखलच चिखल पसरले आहे.या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तर कर्णा पाटी ते सलगरा हद्दीतील वतापर्यंत च्या रस्त्याचे अक्षरशः रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची चाळण होवून या रस्त्याचे बारा वाजले आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून व या भागातील नागरीकांमधून नाराजी व्यक्त केल्या जात आहे. त्याचबरोबर नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून वाट काढावी लागत आहे.एखादे वाहन रस्त्यावर असल्यास दुसरे वाहन जाण्यास रस्ता नसतो हा रस्ता अरुंद असून ह्या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करावे अशी गावातील सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.