आशाताई बच्छाव
पांधन रस्त्यांचा प्रशासनास विसर पडला की काय ?
युवा मराठा न्युज नेटवर्क.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
ग्रामीण भागातील बहुतांशी शेतकरी वर्ग हा शेत मळ्यात वास्तव्यास आहेत. तसेच त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना वेळोवेळी या पांधण रस्त्यांचा वापर करावा लागतो. त्यात शाळकरी मुले,मजूर वर्ग, महिला वर्ग इत्यादी घटकांचा रस्त्याचा वापर होत असतो परंतु आजच्या घडीला पांधण रस्त्यांची अवस्था फार दयनीय आहे. यात ठिक ठिकाणी खड्डे पावसाने भरले त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल मुख्य रस्त्याला आणणे फार अवघड होत आहे .तसेच शाळकरी मुलांना पावसाळ्यात तर मोठी कसरतच करावी लागते. याच अनुषंगाने ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकनियुक्त पदाधिकारी यांना लेखी निवेदन दिलेले आहेत. या निवेदनाद्वारे पिंगळवाडे ते विरगावपाडे, पिंगळवाडे ते ताहाराबाद, पिंगळवाडे ते विजयनगर या पांधण रस्त्यांचा समावेश आहे. पण मात्र लोकनियुक्त पदाधिकारी यांनी पूर्णपणे डोळे झाक केले आहे किंवा त्यांना रस्त्यांचा विसर पडला असावा. त्यातच ग्रामपंचायत या कामासाठी सक्षम आहे परंतु ग्रामपंचायतीकडे पुरेशी निधीची कमतरता असल्यामुळे त्यांच्या मार्फत हे रस्ते मजबूती करणे शक्य नाही. याकरिता जिल्हा परिषद किंवा आमदार निधीची आवश्यकता असते. तरीसुध्दा अशा परिस्थितीत स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाच्या निधीची वाट न बघता वेळोवेळी स्वतःच्या खिशाला झळ देऊन हे रस्ते तात्पुरत्या स्वरूपात सुधारणा केली आहे. पण मात्र पुन्हा हे रस्ते स्वखर्चातून सुधारणा होणे शक्य नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्या नुसार जे पण पांधण रस्ते आहेत त्यांची अवस्था आज फार वाईट आहे. त्याचे खडीकरण किंवा डांबरीकरण होणे गरजेचे आहे व विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची फार गरजेचे आहे.