राजेंद्र पाटील राऊत
Birthday Special : एलसीबीप्रमुख बळीराम गीते गुन्हेगारांचे कर्दनकाळ तरीही सहृदयशील अधिकारी… सामान्य कुटुंबातील या कर्तबगार अधिकाऱ्याची अशी आहे अनोखी कहानी!
बुलडाणा (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) ः जिल्ह्याला मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सध्या बुलडाणेकर नशिबवानच म्हणावे लागेल. अपवाद वगळता बहुतांश सर्वच अधिकारी कर्तव्यकठोर आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेले दिसून येतात. त्यातल्या त्यात पोलीस विभागातील तर सर्वच अधिकारी सध्या जनतेला खाकीशी एकरूप करण्यात गुंतलेले दिसून येतात. कोणताही दबाव सहन न करता सामान्यांच्या रक्षणासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपणाऱ्या जिल्ह्याच्या पोलीस दलाने साहाजिकच सामान्यांच्या मनात वेगळी उंची गाठली आहे. पोलीस अधिकारी म्हटलं की, करारी चेहरा, बोलण्यात जरबता आलीच. त्यातल्या त्यात स्थानिक गुन्हे शाखा सांभाळणारा अधिकारी म्हणजे गुन्हेगारांचा कर्दनकाळच… पण असे असूनही स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख बळीराम गीते हे खाकीतली माणुसकीही तितकीच जपून आहेत. याचे प्रत्यंतर वारंवार जिल्ह्याला दिसून आले आहे. संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी परंपरेशी जुळलेले श्री. गिते दीड वर्षापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार सांभाळत आहेत. आज, १० फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने…
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक या छोट्याशा खेड्यात सामान्य शेतकरी अन् वारकरी कुटुंबात बळीराम गिते यांचा जन्म झाला. ५ भावंडांत ते सर्वात लहान. घरात वारकरी परंपरा असल्याने रोज सकाळी त्यांची आई त्यांना नदीवर अंघोळीसाठी आणि नंतर गावातल्या काकड आरतीसाठी पाठवायची. गावातील ८० लोक माळकरी. त्यामुळे गावातील मंदिरावर भजन, कीर्तन, भारुडे म्हणण्यासाठी ते जायचे. त्यामुळे संतसाहित्याची गोडी बालवयातच लागली. पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. ८ ते १० वीपर्यंत शिक्षणासाठी बदनापूर येथे रोज ४ कि.मी. पायी जाणे आणि येणे असा ८ कि.मी.चा प्रवास केला. दरम्यान, आई- वडील शेतकरी असल्याने शेतात नांगरणी, वखरणी, पेरणी अशीच सर्वच कामे ते करायचे. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते जालन्यात आले. जालन्याच्या जेईएस महाविद्यालयात ११ वी, १२ वी, बी.कॉम., एम. कॉम., बी. एड. आणि डी.बी. एम. असे शिक्षण घेतले. जालन्यात भाड्याची खोली, हाताने केलेला स्वयंपाक आणि अभ्यास हे दिवस अविस्मरणीय असल्याचे ते सांगतात. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांचा संतसाहित्याचा अभ्यास सुरूच होता. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, तुकोबारायांची गाथा, एकनाथ महाराजांची भारुडे आणि कबिरांच्या दोह्यांनी जीवन घडविल्याचे ते सांगतात.