राजेंद्र पाटील राऊत
सटाणा,-(शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
बागलाण तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार झालाअसून या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बागलाण तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी नंदकिशोर धोंडू पवार वय 41 वर्ष असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते काल सायंकाळी त्यांच्या मोटरसायकलवर दिघावे येथे अंडे घेण्यासाठी गेले होते अंडी घेऊन परत येत असताना दिघावे व नांदीन च्या दरम्यान असलेल्या पिसोळबारीच्या घाटामध्ये त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करत मोटरसायकल वरून खाली पाडून जंगलात फरफटत ओढत नेऊन जाऊन त्यांच्या शरीराचे लचके तोडून ठार केले. सायंकाळी दिघावे येथेअंडे घेण्यासाठी गेलेले नंदकिशोर पवार हे सकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी काळजीपोटी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांची मोटरसायकल घाटाच्या पायथ्याशी दिसून आली. त्यावेळी नातेवाईकांनी नंदकिशोर पवार यांना ज्या ठिकाणाहून बिबट्याने पाडले होते ,त्या ठिकाणी त्यांना ओढत नेण्याचे निशाण दिसल्याने त्या दिशेने शोध घेतला त्यावेळी त्यांचा मृतदेह लचके तोडलेल्या छिन्न विछन्न अवस्थेत जंगलात मिळून आला.
या घटनेची माहिती नागरिकांनी जायखेडा पोलीस स्टेशन व वनपरिक्षेत्र अधिकारी ताराबाद यांना दिली व तात्काळ जायखेडा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश कांबळे या दोन अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सह धाव घेत घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला व पवार यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्या मुळेच झाल्याचे सांगितले .पवार यांच्या पश्चात एक मुलगा मुलगी व पत्नी असा परिवार आहे.
याबाबत वारंवार बिबट्याचे दर्शन होत होते अशी नागरिकांत चर्चा असून खबरदारी म्हणून अनेक वेळा वन विभागाला देखील सुचित केले होते .या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून रात्री बाहेर पडणे व शेतातील पिकांना पाणी भरणे वगैरे कामे करताना आपला जीव मुठीत घेऊन पाणी भरावे लागते . पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तरी बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत नागरिकांकडून मागणी होत आहे.
” बिबट्याचे वारंवार नागरिकांना दर्शन होत होते त्यामुळे नागरिकांमध्ये भिती होती याबाबत अनेक वेळा वन विभागाला सुचित केले गेले होते व पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती”
(अमित पवार, मा.सरपंच नांदिन)
“आम्ही शेतात राहत असून डोंगरा जवळ शेत आहे रात्री शेतातील पिकांना पाणी देताना बिबट्याच्या भीतीपोटी जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी भरावे लागते”
(गोरख बोरसे शेतकरी नांदी न)