राजेंद्र पाटील राऊत
महावितरणची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नवी योजना! ऊर्जामंत्र्यांचा पुढाकार
➖ युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
महामानव डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त (ता. १४) योजनेचा राज्यात शुभारंभ करण्यात येत असून बाबासाहेबांच्या जयंतीपासून महापरिनिर्वाण दिनापर्यंत (६ डिसेंबर) पर्यंत योजना सुरू राहणार आहे.
🗣️ ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा पुढाकार:
राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला आहे.
💫 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित व उपेक्षित घटकांचे मुक्तिदाते:
शिक्षणाच्या बळावर व उपेक्षित, शोषितांच्या व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणण्याचे काम त्यांनी केले असून एक प्रकारे आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतला आहे. याशिवाय या योजनेत अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी, समस्यांचे निवारण करण्याबाबतच्या उपाययोजनांचाही समावेश आहे.
💡 अशी आहे योजना :
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीकरिता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, रहिवासी दाखला आदी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफ लाईन अर्ज करणे आवश्यक राहील. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. लाभार्थ्याने ५०० रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहील. अर्जदारांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
📍 महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल. तसेच जेथे अर्जदारास वीज जोडणीकरीता विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास अशा ठिकाणी महावितरणद्वारे निधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.