मराठा आरक्षण सुनावनी लांबल्याने प्रवेश प्रक्रियाही लांबली
युवा मराठा न्यूज
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत लागू करण्यात आलेले सर्व लाभ रद्द करण्याचे अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रवेश प्रक्रिया 9 सप्टेंबरपासून थांबविण्यात आली आहे. यामुळे अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी तसेच आयटीआय तसेच सुरू होणारी पॉलिटेक्निक प्रवेशाची मुदत वाढवत प्रवेश ढकलले जात आहेत.
राज्यभरात अकरावीसोबत, आयटीआय आणि अन्य अभ्यासक्रमाचेही प्रवेश मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे बंद आहेत. तब्बल दीड महिन्यांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीतही विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. ही सुनावणी लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश आणखी चार आठवडे लटकले आहेत. यामुळे प्रवेशाविना राज्यात विविध प्रवेशांसाठी लाखो विद्यार्थी खोळंबून आहेत.
अकरावीला मुंबई विभागातून एक लाख 49 हजार 12 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. आता त्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अकरावी प्रवेशसाठी 12 टक्के मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे. यानुसार मुंबई विभागात पहिल्या फेरीसाठी 17 हजार 844 जागा उपलब्ध होत्या. या जागांवर 2 हजार 923 अर्ज आलेत त्यापैकी 2788 विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण प्रवेशात मराठा आरक्षण लागू करू नये, असे निर्देश देऊन मराठा आरक्षणाला 9 सप्टेंबर रोजी स्थगिती दिली.
त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीतही विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवल्याने आता आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रवेशानंतर शैक्षणिक वर्ष व परीक्षा हे कधी होणार असा प्रश्न आता विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असताना, अकरावीचे विद्यार्थी मात्र अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश घेतल्यानंतर त्यांना अकरावीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेनंतर बारावीची परीक्षा, तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारीही करावी लागणार आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी
मोहन शिंदे.