आशाताई बच्छाव
वनोजा सर्कलमधील फळबागा नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत द्या – सुरेश मापारी
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा सर्कलमध्ये वादळासह पाऊस पडल्याने शेतकर्यांच्या फळबागाचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त नुकसान शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि. प. अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
१७ मार्चला दुपारी तीनच्या दरम्यान वादळासह पाऊस कोसळला. त्यामुळे या सर्कलमधील अनेक गावात घरावरील टिनपत्रे उडून गेली. लग्न समारंभासाठी टाकलेले मांडव व साहित्य या वादळात उडून गेले. शेतातील संत्रा, आंबा, ज्वारी, कांदा आदी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासन व शासन यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा नुकसानग्रस्त शेतकरी निराश होवून कोलमडून पडेल. सुरेश मापारी यांनी गारपीट व वादळात सापडलेल्या परिसराची पाहणी करून जिल्हाधिकारी यांना तसे फोनवरून माहिती देत मदतीची मागणी केली आहे. याआधी झालेल्या गारपिट प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने अद्यप नुकसान भरपाई दिली नाही. तर पुन्हा आता हे दुसरे संकट शेतकर्यावर कोसळले आहे. आता तरी शासनाने याबाबत गांभीर्याने घेत महसूल विभागाला नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अहवाल पाठवण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी सुरेश मापारी यांनी केली आहे. यासोबतच घरावरचे तीन उडून गेल्यामुळे बेघर झालेल्या नागरिकांना निवार्याची व्यवस्था करावी अशी ही मागणी मापारी यांनी केली आहे.