आशाताई बच्छाव
ताहराबाद वनविभागाच्या हद्दीतील प्रकार;जंगलाला लागली आग, वनविभागाला कधी येणार जाग…?
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव- नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद वनविभागाच्या अखत्यारीत येणा-या महड,टेंभे,जुने बिलपूरी,वडे खुर्द,इजमाने,चिराई,राहुड येथील वनविभागाच्या जंगलात गत तीन वर्षांपासून सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत असूनही वनविभाग या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.
या जंगलात वन्यप्राण्यासाठी पाणवठे बांधलेले असून,मात्र वारंवार या जंगलाला लागणा-या आगीच्या घटना बघता येथे नोकरीस असलेलं वनविभागाचे सागर पाटील व वनपाल नेमके कोणते कर्तव्य बजावतात यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.वास्तविक आज ३ मार्च रोजी वन्यजीव प्राणी दिन साजरा होत असतानाच अगदी अलिकडेच महड टेंभे परिसरातील वनविभागाच्या जंगलाला आग लागून वणवा पेटला त्यामुळे वन्यजीव प्राण्यांवर पाण्यासाठी गाव वस्तीकडे शिरकाव करण्याची भिती व्यक्त केली जात आहे.वन्यप्राण्यांनी नागरी वसाहतीमध्ये शिरकाव करून काही विपरीत दुर्घटना घडल्यास त्याची नैतिक जबाबदारी कुणाची?असा सवाल उपस्थित करुन महड व परिसरातील नागरिकांनी अशा स्वरूपाच्या गंभीर आग लागण्या सारख्या घटना घडूनही सागर पाटील नामक कर्मचारी व वनपाल दोन तीन दिवसांपासून या भागात फिरकले देखील नसल्याचे संतप्त होऊन सांगितले.तर या प्रकरणी लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा वन श्रमिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र सांळुखे यांनी “युवा मराठा” शी बोलताना दिली.