आशाताई बच्छाव
मुली शिकल्या नसत्या तर……!
भारतीय संस्कृती हे पुरुषप्रधान संस्कृती म्हणून काळाच्या ओघात उदयास आली .धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष या चतु:सूत्री वर आधारित जीवनाची दिशा ठरवली गेली आणि त्यानुसार जीवन पद्धती अवलंबित असता पुरुषाने व स्त्रीने आपली कर्तव्य निश्चित करून घेतली. घराबाहेरची जबाबदारी पुरुषाने स्वीकारली व घरातील व्यवस्था पाहण्याची जबाबदारी स्रीने स्वीकारली. परंतु काळाच्या ओघात स्त्रिया पुरुषांचे हित साधण्यात आपले कर्तव्य समजू लागल्या व यातूनच त्यांची प्रगती खुंटली. मोकळी हवा, स्वतंत्र विचार, प्रगती या गोष्टीपासून स्त्री वंचित राहिली व याचाच परिणाम म्हणजे स्त्रियांना चूल आणि मूल या पलीकडचे काही अधिकार राहिले नाहीत. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत बनतो पण तो अधिकार पुरुषांनी स्त्रियांना कधीच दिला नाही आणि त्यातूनच मुलींच्या शिक्षणाची क्रांती सुरू झाली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे नसते आणि यांनी जर मुलींच्या शिक्षणाची दारे खुली केली नसती तर आजही स्त्रियांची मुलींची अवस्था तशीच राहिली असती. पण त्यांना संजीवनी देणाऱ्या त्या थोर विभूतींनी त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविला. ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ असं बोधवाक्य आपण नेहमीच ऐकतो. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मुली प्रगतीपथावर आहेत. मग ते वैद्यकीय क्षेत्र असो, तंत्रज्ञानाचे असो किंवा अधिकार पदाच्या जागा असो कोणत्याही कार्यालयामध्ये डोकावले तरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुली आज उंबऱ्या बाहेर पडून आपली प्रगती करताना दिसत आहेत. कल्पना चावला किंवा सुनिता विल्यम्स सारख्या स्त्रिया अवकाश गमन करताना आपल्याला दिसतात. जर तर चा प्रश्न हा अनेक प्रश्न निर्माण करीत असतो. पुरुषाने काहीच काम केले नाही तर कुटुंब लयास जाते. स्त्रीने आपली कर्तव्य पार पाडली नाहीत तर कुटुंब व्यवस्था मोडकळीस येते. त्याचप्रमाणे मुली जर शिकल्या नसत्या तर आजचा जो प्रगत समाज आहे तो घडला नसता. शिक्षण स्त्रीला स्वच्छ बोलणे, मानाने जगणे शिकविते. एक मुलगी शिकली तर भावी माता म्हणून आपल्या कुटुंबाला एक वेगळे वळण देते. त्यांचा विकास करते. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते.एका मुलीच्या शिक्षणातून उद्याच्या संपन्न कुटुंबाची, समाजाची जडणघडण होते. शिक्षणच स्त्री-उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजेचे आहे. एक आई आपल्या मुलाचा जसा अभ्यास घेईल तसा कोणत्याही शिकवणी वर्गात घेतला जाऊ शकत नाही. कारण सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगलं वागणं, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. पुस्तकं ज्ञानाबरोबर समाजात वावरण्याचे धडे मुलांना तिच्याकडूनच मिळतात. सगळ्याच दृष्टीने सशक्त पिढी ती तयार करते. म्हणून मुलांच्या बरोबर मुलींनाही शिक्षण मिळणे गरजेचे आहे व त्यातच सर्व समाजाचेच नव्हे तर संपूर्ण मानव जातीचे कल्याण आहे. शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळते, जे इतर अनेक स्वातंत्र्याशी निगडित असते.
इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, कॅप्टन लक्ष्मी, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू यांनी जे भारतीय इतिहासातच नव्हे तर जगाच्या इतिहासात जे आपले स्थान निर्माण केले हे वाखाणण्याजोगे आहे. किंबहुना जागतिक कीर्ती त्यांना लाभली यांच्या मुळाशी त्यांना मिळालेले शिक्षण आहे. म्हणून मुलींना शिक्षण देणे हे समाज उन्नतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचा प्रत्येक भारतीयांनी विचार केलाच पाहिजे. खरेच मुली शिकल्या नसत्या तर आजचा सुसंस्कृत संपन्न आणि विकसित भारत घडलाच नसता.
सविता तावरे
महाराष्ट्र भूषण- मुंबई प्रतिनिधी
युवा मराठा- मुंबई स्पेशल रिपोर्टर
स्वराज्य पोलीस मित्र संघटना
(संचालक तथा मुंबई अध्यक्षा)
ग्राहक सेवा संस्था
(मुंबई महिला अध्यक्षा)