आशाताई बच्छाव
पनीर कारखान्यातील रसायन युक्त पाण्यामुळे शेती धोक्यात ?
तुमसर तालुक्यातील येरली येथील प्रकार
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )तुमसर तालुक्यातील पचारा येथील पनीर निर्मिती कारखान्यातून निघणारे रसायन युक्त पाणी शेत शिवारात नियमबाह्यपणे सोडणे सुरू आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पाच एकरातील पीक धोक्यात आले आहे.येथे शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. परंतु प्रशासनाने अजून पर्यंत कोणतीही दाखल घेतली नाही त्यामुळे येथील शेतकऱ्यात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
पचारा येथे पनीर निर्मिती करणारा कारखाना असून कारखान्यातील रसायन युक्त पाणी नियमबाह्यपणे शेतशिवारात कारखानदाराकडून मागील काही महिन्यापासून सोडले जात आहे. त्यामुळे शेतीतील पीक धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार करूनही अजून पर्यंत कारखानदारावर कोणतीच कारवाई झाली नाही उलट सदर कारखानदार संबंधित शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देतो त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जीवालाच धोका निर्माण झाला आहे. पीक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे येथील शेतीही सुपीक व उपजावू आहे. महागडी शेती धोक्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कारखानदाराची दादागिरी येथे सर्रास सुरू असल्याने गावकऱ्यातही भीतीचे वातावरण आहे.
पचारा गावालगत असलेल्या शेतीशिवारात पनीर तयार करण्याचा कारखाना आहे. कारखाना शेतात असल्याने कारखान्याला लागुन इतर शेतकऱ्यांची शेती आहे.पनीर कारखान्यातील रसायन युक्त पाण्याला फिल्टर करुण सोडायचे आहे. पण कारखान्यात फिल्टर प्लांट नाही. त्यामुळे वाटेल त्या जागेत कारखान्याचा दुषित पाणी सोडला जातो. पण आता शेतकऱ्यांनी धान शेती लागवड केली असल्याने त्यांच्या शेतात पाणी जात शेतीत पाण्याचा लालसर थर बसून जवळपास पाच एकरावरील धान पीक खराब झाले आहे. या संबंधित शेतकऱ्यांनी कारखाना मालकाला अनेकदा सांगितले पण कारखाना मालक दादागिरी करत असून जो बनते ते करा असे उत्तर देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार तुमसर पोलीसात दिली होती. परंतु अद्यापही ठोस कारवाई झाली नाही. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान सुरू असून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
——-@——
येरली शेतशिवारात माझी पाच एकर शेती असून त्यातील एक एकरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात रसायन युक्त पाणी कारखान्यातून सोडण्यात येतो. याप्रकरणी तहसीलदार व तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. परंतु त्याच्या काहीच उपयोग होत नाही.
गणेश रहांगडाले, शेतकरी, येरली
—–@—–
येरली शेत शिवारात माझी उपजावू शेती आहे. त्यात कारखान्यातील रसायनयुक्त पाण्यामुळे माझी शेती खराब झाली आहे. पी वन पी टू वर माझी नोंद आहे. उलट कारखानदार येथे मला जीवे मारण्याची धमकी देतो.
रमेश पटले, शेतकरी, येरली
——–@——
संबंधित प्रकरणाची प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत चौकशी करण्यात येईल.
-बाळासाहेब तेळे
तहसीलदार, तहसील कार्यालय तुमसर
——-@——-