आशाताई बच्छाव
वाशिम येथे सात दिवसीय श्रीमद् भागवत गिता ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व धनलक्ष्मी बिल्डर्सचा पुढाकार
वरदानी भवन येथे पत्रकार परिषद : ब्रह्माकुमारी स्वातीदिदी यांची माहिती
वाशिम, गोपाल तिवारी – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व धनलक्ष्मी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्या संयुक्त आयोजनातून स्थानिक रिसोड रस्त्यावरील मराठा कर्मशियल कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवार, १ डिसेंबर ते ७ डिसेंबर असे सात दिवस रामायण, महाभारत आणि भगवद् गितेवर आधारीत श्रीमद् भागवत गीता ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक सिव्हील लाईन स्थित ब्रह्माकुमारी वरदानी भवन येथे सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी आयोजीत पत्र परिषदेत प्रजापिता ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी स्वातीदिदी यांनी दिली.
यावेळी ब्रह्माकुमारी पार्वतीदिदी, ब्रह्माकुमारी पुजादीदी, शंकर जिवनाणी, सुरेश बगाडे, नंदकुमार मुंधरे, मुकेश पटेल, विलास बोटके, दिगंबर तिलगाम यांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा स्वातीदिदी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, पेन देवून सत्कार करण्यात आला. पुढे बोलतांना ब्रह्माकुमारी स्वातीदिदी म्हणाल्या की, मुख्य वक्त व भागवत गीता प्रवक्ता, कटनी मध्यप्रदेश येथील ब्रह्माकुमारीजच्या संचालीका राजयोगिनी ब्र.कु. भारती दिदीजी यांच्या रसाळ वाणीतून दररोज सात दिवस दुपारी २ ते ५ वाजेपर्यत गीता प्रवचनाचा लाभ भाविकांना घेता येईल. या सप्ताहादरम्यान गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सिव्हील लाईन स्थित ब्रह्माकुमारी ईश्वरीय वरदानी भवन येथून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवार, १ डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिम व अकोला जिल्हा ब्रह्माकुमारीजच्या संचालीका राजयोगिनी ब्र.कु. रुख्मिणी दिदीजी ह्या असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक, वाशिमचे आमदार लखन मलीक, कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, माजी नगरसेवक प्रभाकर काळे, शहर पोलीस निरिक्षक गजानन धंदर, सुप्रसिध्द ह्दयरोग तज्ञ डॉ. सिध्दार्थ देवळे, होमिओपॅथीक तज्ञ डॉ. श्रीकांत राजे, मराठा मेडीकलचे संचालक श्याम नेनवाणी, आडते गिरधारीलाल सारडा, अॅड. अविनाश देशपांडे आदींची उपस्थिती राहील. दरम्यान सात दिवसाच्या दैनंदीन कार्यक्रमामध्ये सकाळी साडेसहा ते साडेसात पर्यत म्युझिकल एक्झरसाईज व मेडीटेशन, सकाळी साडेसात ते साडेआठ पर्यत जीवन बनवा सुखकर शिबीर व दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यत गिता प्रवचन असे कार्यक्रम होतील.
आजच्या घोर कलयुगात दु:ख, अशांती, रोग, भय, चिंतारुपी संकटाचे ढग दाटून आले आहेत. तर एकीकडे श्रीमद् भगवद् गितेमध्ये वर्णित धर्मग्लानीचे सर्व लक्षण पुन्हा प्रकट झाले आहेत. त्यामुळे विश्वाच्या भविष्याबाबत संपूर्ण मानवमात्र चिंतीत झाला आहे. या कठीण समस्येचे उत्तर केवळ भगवद् गितेमध्येच मिळू शकते. त्यामुळे मनुष्य कितीही निराशेत डुबलेला असेल तरी केवळ गीता ज्ञानमातेला शरण आल्याने त्याचे जीवन आनंदी होवू शकते. असे आनंदी जीवन जगण्याकरीता शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून प्रवचनाचा लाभ घेण्याचे आवाहन ब्रह्माकुमारी स्वाती दीदी यांच्यासह आयोजकांनी केले आहे. दरम्यान वाशिम येथील कार्यक्रमानंतर अनसिंग आणि मालेगाव येथेही श्रीमद् भगवद् सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ब्रह्माकुमारीज मिडीया विंगचे सदस्य रवि अंभोरे यांनी प्रास्ताविकातून दिली. मुकेश पटेल यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले.