आशाताई बच्छाव
तोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले
एट्टापल्ली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार)-: मागील अडीचशे दिवसांपासून सुरू असलेल्या तोडगट्टा आंदोलनाला शासनाने पोलीस बळाचा वापर करून आज चिरडून टाकल्याचे प्रकरण उघडकीस आले. याबाबत माहिती मिळताच शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार आणि सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख सैनू गोटा सदर आंदोलनस्थळी कारवाई नंतरही ठाण मांडून असलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी निघाले असता गट्टा – जांभीया पोलीस मदत केंद्राजवळ त्यांना अडविण्यात आले.
याबाबत भाई रामदास जराते यांनी हेडरीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून सैनू गोटा हे या क्षेत्राचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिला गोटा या क्षेत्रातील माजी पंचायत समिती सदस्य असल्याने आम्हाला तोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून आणि आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी अडवू नये यासंबंधात चर्चा केली. मात्र संवेदनशीलतेचे कारण देवून अडवून ठेवण्यात आले.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार खदान कंपन्यांच्या इशाऱ्यावरुन पोलीस बळाचा वापर करून जनतेची मुस्कटदाबी करीत आहे, असा आरोप करुन तोडगट्टाचे खदान विरोधी आंदोलन दडपशाही केल्याने संपणार नसून संपूर्ण जिल्हाभरातील मंजूर आणि प्रस्तावित लोह खदानींच्या विरोधातील आंदोलन संविधानिक पध्दतीने व्यापक स्वरूपात सुरुच राहणार असल्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, माजी पंचायत समिती सदस्य शिलाताई गोटा यांनी दिला आहे.