आशाताई बच्छाव
विज्ञानाने घडतो माणूस!
आकाशाच्या सरोवरात पृथ्वीचे हे विराट ‘कमलपुष्प’ उमलले आहे. तो भ्रमरचंद्र आपले रुपेरी पंख पालवून त्याभोवती अविरत गुंजाख करत आहे. या पुष्पाच्या पाकळीवर एक दवबिंदू पडला आहे, त्याचेच नाव “जीवन”!
जीवन सुसह्य करण्यासाठी आदिमानवापासून आजपर्यंत एकच शस्त्र (नव्हे शास्त्र) वापरण्यात आले ते म्हणजे विज्ञान!
गरज ही शोधाची जननी आहे. मानवाच्या अनेक गरजा भागवण्यासाठीच विज्ञानाचा जन्म झाला आणि याच विज्ञानाने अज्ञान तिमिर दूर करून ज्ञानाचा प्रकाश पाडला. त्यामुळेच पुरातन काळात अज्ञानाच्या गडद अंधारात खितपत पडलेला मानव बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगतीपथावर घोडदौड करत आहे. उज्वल उदयाकडे झेपावत आहे.
आज अनेक यंत्रे आपल्यासमोर हात जोडून उभी आहेत. कठीण आकडेमोडी करता कॉम्प्युटर, पाणी तापवण्यासाठी गिझर, प्रगत वाहतुकीची साधने, दूरच्या जगात काय चालले आहे त्याचे दर्शन देणारा दूरदर्शन! आज स्त्रियाही हम भी किसीसे कम नही म्हणून पुरुषांबरोबर घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पाटा व वरवंटा जाऊन त्या जागी मिक्सर आला, वेळेची बचत करण्यासाठी धुलाईयंत्र आले. ‘स्त्री रांधा वाढा, उष्टी काढा’ च्या चाकोरीतून बाहेर येऊन प्रगती करू शकली. विज्ञान मानवाला मिळालेली एक सुंदर भेट आहे. विज्ञान केवळ एक अंदाज नाही तर एक जूनून आहे.
आज मानवाने आकाशात झेप घेतली. सागरतळाचा ठाव घेतला. चंद्रावर त्याचे पहिले पाऊल उमटवले. मंगळावर वस्ती करण्याच्या तो क्लुपत्या शोधू लागला, सर्व विज्ञानाच्या वरदहस्तांमुळेच तर त्याला प्राप्त झाले नं?
विज्ञानाचा ठेवू ध्यास, मानवाचा करू विकास,
विज्ञानाची किमया न्यारी, अचंबित दुनिया सारी.
‘विज्ञान’ या तीन अक्षरांनी तीनही लोक व्यापून टाकले आहेत. विज्ञानाची कास धरून मानवाने मृत्यूवर मात केली आहे. टेस्ट ट्यूब बेबी, क्लोनिंग या प्रयोगांनी निसर्गाचा निर्मितीचा हक्क मानवाच्या हाती सोपवला आहे. हृदयारोपण सारख्या शस्त्रक्रिया यशस्वी करून मानवाने यम दूताला परतविले आहे. जगाचा स्वामी ज्या दुर्धर रोगांवर इलाज करू शकला नाही, त्या रोगांच्या नाकावर टिच्चून आज सामान्य माणूसही जीवन जगत आहे.
जे न देखवी रवी,
ते विज्ञान दाखवी!
अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पण नाण्याला दोन बाजू असतात. विज्ञानाच्या फायद्याबरोबर तोटेही आहेत. फक्त दूरदर्शनचे दर्शन करून न घेतल्याने आजची पिढी त्याचे परिणाम भोगत आहे. दूरध्वनी उचलून नंतर डायल केल्याने आप्त आपल्याशी बोलू शकतात, त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.
विज्ञानाच्या सदुपयोग केला तर वरदान! दुरूयोग केला तर अभिशाप!! शेवटी विज्ञान हे एक दुधारी शस्त्र आहे, हे हातात घेऊन या धरणी मातीत फुले आणि नंदनवन फुलवायचे की स्वर्ग असलेल्या विश्वाचा संहार करायचा हे अखेर आपल्याच हातात आहे ना!
विज्ञानाने केली प्रगती,
मानवाला मिळाली गती.
जय विज्ञान! जय तंत्रज्ञान!!
सविता तावरे
युवा मराठा मुंबई स्पेशल न्यूज रीपोर्टर