आशाताई बच्छाव
एकविसाव्या वर्षी सलग अकराव्यांदा स्वेच्छा रक्तदानाचा युवकाचा सामाजीक आदर्श
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)– आजचा युवक मोबाईल गेम, व्यसन आणि समाज माध्यमांमध्ये हरवला आहे अशा कितीही हाकाट्या पिटल्या तरी डिजीटल वादळामध्येही युवकांनी मेंदु जाग्यावर ठेवून समाजाचा ‘जागल्या’ म्हणून आपली क्रिएटीव्हीटी पणाला लावून इतरांपुढे आदर्श ठेवला असल्याची उदाहरणे समाजात जागोजागी आढळून येत आहेत. यातीलच एक उदाहरण म्हणजे लहानपणी आजारामध्ये स्वत:ला रक्तदान केलेल्या त्या अज्ञात रक्तदात्याचे सामाजीक ऋण लक्षात ठेवून वैभव पिंपळकर या विद्यार्थीदशेत असलेल्या युवकाने बुधवार, ११ ऑटोंबर रोजी २१ व्या वर्षी शासकीय रुग्णालयात अकराव्यांदा स्वेच्छा रक्तदान करुन आजीवन रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे.
वैभव हा पत्रकार संदीप पिंपळकर यांचा सुपुत्र असून तो अमरावती येथे आयटी कॉम्प्युटच्या प्रथम वर्षात शिकत आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्याने स्वेच्छामनाने सुरु केलेली ही रक्तदानाची चळवळ वयाच्या २१ व्या वर्षीही सुरु ठेवली आहे. तीन महिने झाले की तो तडक उठतो आणि शासकीय रुग्णालयात जावून आपले ऐच्छिक रक्तदान करतो. याचा त्याने कुठेही गाजावाजा किंंवा प्रसिध्दी केली नाही. मात्र आपली सामाजीक जबाबदारी ओळखून त्याच्या ‘एकला चलो रे’ च्या संकल्पाचे त्याचा परिवार आणि मित्रमंडळींकडून कौतूक होत आहे. वैभवच्या रक्तदानाचा आदर्श घेवून त्याचे अनेक मित्रही स्वेच्छा रक्तदानाचा हा गोवर्धन पर्वत आपल्या खांद्यावर उचलण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अर्थातच रक्तदानाच्या या पवित्र आणि ऐच्छिक कार्यामागे आपण आपल्या रक्तदानाने इतरांचा जीव वाचवू शकतो ही भावना मनाला अमृतमय समाधान देणारी आणि स्वत:ला देवत्वाकडे नेणारी असल्याचे मत वैभवने व्यत केले असून तातडीच्या प्रसंगी रुग्णांना मदत मिळावी यासाठी युवकांनी आपले ऐच्छिक रक्तदान करुन या राष्ट्रीय कार्यात आपली सामाजीक जबाबदारी उचलावी असेही आवाहन केले आहे.